Thursday, April 17, 2014

स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे !


स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे ! ( बेवड्याची डायरी - भाग २८ वा )

अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या दुसऱ्या पायरीत सरांनी ईश्वर किवा उच्च शक्तीचे स्वरूप ...तसेच प्रत्येकाच्या जिवनात ती उच्चाशक्ती निसर्ग ..नातलग ..समाज यांच्या रूपाने कशी अस्तित्वात आहे हे मागच्या वेळी उलगडून सांगितले होते ..मला ते पटलेही होते ..एखादा विशिष्ट देव ..धर्म ..बाजूला ठेवून आपल्यावर प्रेम करणारे नातलग ..आपल्याला जीवन आनंदीपणे व्यतीत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करणारा समाज ..नैसर्गिक ..कौटुंबिक अथवा सामाजिक नियम ..इतकेच काय पण आपण देशात रहातो त्या देशाचे कायदे हे सर्वच ईश्वर या व्याख्येत मोडत असतात ..या सर्व गोष्टी आपल्याला मर्यादेने जगण्यास शिकवतात ..निसर्गाने प्रत्येक जीवाला काही क्षमता दिलेल्या आहेत तशाच काही मर्यादा देखील घातल्या आहेत ..या मर्यादा जे लोक मान्य करत नाहीत ते बंडखोरी करतात ..स्वतच्या मर्जीने जीवन व्यतीत करू इच्छितात ..त्यामुळेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो ..हे नियम जाचक वाटून ते क्रोधीत होतात ..निराश ..वैफल्यग्रस्त होतात ..त्यांचे जीवन जगणे अधिक अधिक कठीण होते ...आपले सगळे अहंकार बाजूला ठेवून ..आपल्या मर्यादा समजून घेवून ..या ईश्वरी शक्तीला समजून घेतले तर ..या शक्तीला सहकार्य करत नक्कीच आनंदीपणे जगणे अधिक सोपे होते ..

आजच्या समूह उपचारात सरांनी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या तिसऱ्या पायरीवर चर्चा करण्यास सुरवात केली ..तिसऱ्या पायरीत म्हंटले आहे की.. ' आम्ही आमच्या इच्छा व जिवन आम्हास समजलेल्या ..उमगलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला ' ..ही पायरी वाचून सरांनी एक प्रश्न विचारला ..' आपल्या पैकी कोणा कोणाला स्वताचे जिवन हे आपण स्वतः निर्माण केले आहे असे वाटते ? त्या लोकांनी हात वर करावा ' ..कालच दुसऱ्या पायरीबद्दल समर्पक चर्चा झालेली असल्याने कोणीच हात वर केला नाही ..सगळ्यांना किमान आपले जिवन आपण स्वतःनिर्माण केलेले नाहीय हे समजले असावे बहुतेक ..सर हसले ..छान ..म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे ..की आपलं जन्म होण्यास ..आपले पालनपोषण होण्यास ..आपले योग्य पद्धतीने शिक्षण होण्यास .. कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत जे आपल्याला मदत करीत गेले ..तरीही जेव्हा पासून आपल्याला समज आली अथवा आपला ' स्व ' म्हणजेच ' मी ' जागृत झाला तेव्हापासून आपण विविध प्रकारच्या इच्छा जोपासण्यास सुरवात केली ..त्या इच्छापूर्तीचा आग्रह धरला ..त्या इच्छापुर्तीतच आपले सुख दडले आहे असा आपला समज होता ..आपले खाणेपिणे ..कपडे घालणे ..मित्र निवडणे ..आवडी निवडी ..अथवा आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवणे ...असे सगळे अधिकार आपण सर्वांनी अगदी नीटच गाजवण्याचा प्रयत्न केला ..जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर कुटुंबीयांनी मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला अथवा त्यांची मर्जी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखे वाटले आपलं ' स्व ' दुखावला गेला ..मग आपण बेदरकारपणे दुरुत्तरे करू लागलो ..घरातील मोठ्या माणसांच्या ..नातलगांच्या सूचनांचा अव्हेर करू लागलो ..आपल्याला अपेक्षित असलेले सुख ..आनंद ..शोधण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग करत गेलो ..एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जगावे असे वाटणे स्वाभाविक आहे.. मात्र आपल्या इच्छा आपल्या भल्याच्या आहेत की नाहीत हे समजण्याची आपली क्षमता नसल्याने .. आपल्या आयुष्यात दुर्दैवाने व्यसनांचा शिरकाव झाला ..तंबाखू ..दारू ..तसेच इतर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये ' अॅडीक्टीव्ह पाॅवर ' म्हणजेच ' सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करून घेण्याची क्षमता ' असल्याने ..नकळत त्या पदार्थांच्या आहारी गेलो ..पाहता पाहता आपण व्यसनाधीनता या गंभीर आजारात अडकलो ..आपल्या अहंकारामुळे आपण यात अडकू शकतो हे आपल्याला समजले नाही ...तसेच अडकल्यावर देखील आपण अडकत चाललो आहोत ..अडकलो आहोत हे आपण हे आपण स्वतःशी मान्य करू शकलो नाही..कोणाची मदत घेण्यास तयार झालो नाही त्यामुळे अधिक अधिक अडकत गेलो ..विविध प्रकारचे नुकसान होत राहिले .. या आजारातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण आता सर्व प्रथम स्वतच्या मर्जीने जिवन जगण्यास मिळावे हा अट्टाहास काही काळ बाजूला ठेवला पाहिजे . 

सर हे सर्व सांगत असताना आम्ही सगळे कान देवून ऐकत होतो ..सरांची व्यवस्थित उलगडून सांगण्याची शैली छानच होती ..पुढे त्यांनी सर्वाना एक प्रश्न विचारला ' जर समजा की तुम्हाला ' मिस्टर इंडिया ' या सिनेमा मध्ये अनिल कपूर सारखे अदृश्य होण्याचे ब्रेसलेट प्राप्त झाले ..तर सर्व प्रथम कोणकोणत्या गोष्टी आपण कराल ? ' प्रश्न जरा गमतीशीरच होता ..आठ दहा जणांनी उत्तरे देण्यासाठी हात वर केले ..शेरकर काकांचा हात देखील वर झाला ..एकेक जण उत्तरे देवू लागला ..सर मी कोणालाही नकळत राष्ट्रपती भवनात जावून फिरून येईल ..मी हॉटेलमध्ये जावून गुपचूप महागडे पदार्थ खावून येईल ..मी ' रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ' मध्ये जावून भरपूर नोटा घेवून येईन ..मी माझ्या शत्रूचा खून करीन ..मी सगळे जग विनातिकीट फिरून येईन ..मी ज्वेलरीच्या दुकानात जावून खूप दागिने आणीन माझ्या पत्नीसाठी ..अश्या प्रकारची उत्तरे सगळे देवू लागले ..शेरकर काका म्हणाले ' मी दारूच्या कारखान्यात जावून विदेशी मद्याच्या खूप बाटल्या आणीन ' सर्व मनापासून हसले ..जणू सर्वांच्या मानतील सामायिक इच्छाच शेरकर काकांनी बोलून दाखवली होती ..

( बाकी पुढील भागात )

ब्लँकआउट !


ब्लँकआउट ! ( बेवड्याची डायरी ..भाग २७ वा )

रात्री नीट झोप झाली नाही ..रात्रीचे जेवून गादीवर पडल्यापडल्या बाजूलाच बसून स्वत:च्या गुडघेदुखीबदल तक्रार सांगत ..स्वत:च्या हाताने गुढघे दाबत बसलेल्या शेरकर काकांची बडबड ऐकत होतो ..सगळे जण झोपेला आलेले ..अकरा वाजता लाईट्स बंद होणार .. तोवर सर्वांची जरा टंगळमंगळ सुरु होती...तितक्यात वार्डचा बाहेरचा दरवाजा उघडून कार्यकर्ते एका धडधाकट व्यक्तीला धरून आत घेवून आले ..तो माणूस मोठमोठ्याने अर्वाच्च शिव्या देत होता ..सगळे धडपडून उठले जागेवरून .. साधारण चाळीशीचा असावा ..अंगावर एक बर्म्युडा होता फक्त ..बाकी वर शर्ट वगैरे काहीच घातलेले नव्हते त .. तब्येत चांगलीच वाटली .. त्याने वार्डमध्ये प्रवेश करताक्षणी दारूचा प्रचंड भपकारा आला ..त्या वासाने कसेतरीच झाले मला ..मळमळल्या सारखे .. त्याला वार्डमध्ये सोडून कार्यकर्ते निघून गेले बाहेर ..तो इकडे तिकडे पिंजऱ्यातील अस्वस्थ वाघासारखा फिरत होता ..मध्येच कोणाला तरी मोठ्याने शिव्या घालत होता ..आम्ही सगळे कुतूहलाने त्याच्या भोवती जमलो ..आमच्या कोणाशीही त्याची ओळख नसतानाही तो सगळे अगदी त्याचे मित्र असल्यासारखा आम्हाला सांगू लागला ' आज सोडलाच नसता त्याला ..वाचला पहा थोडक्यात ..कोथळाच बाहेर काढणार होतो हरामखोराचा ' ..त्याच्या बोलण्यातून आज मरता मरता वाचलेल्या त्या व्यक्तीचे नाव अनिल आहे असे समजले ..हे देखील समजले की अनिल म्हणजे त्याच्या पत्नीचा भावू ..हे महाशय आपल्या साले साहेबांवर खूप संतापलेले होते तर ..त्याच्या मोठमोठ्याने बोलण्यामुळे सर्वांच्या झोपा उडाल्या होत्या ..असा कोणी नवीन वार्डात आला की एकदोन जुने ..पुराने पापी असलेले ..अश्या व्यक्तीची थोडी फिरकी घेतात हे मला माहित होते ..त्या नुसार मस्करी करण्यात हातखंडा असलेल्या शेरकर काकांनी सुरवात केली ..' अरे यार ..चाकूने भोसकणार होते की काय त्या अनिलला तुम्ही ? ..मग मजा नाही ..नुसत्या हाताने एकदोन फाईटी मारून जीव घेतला तर जास्त चांगले असते..चाकूने काय ..कोणीही मरते ..नुसत्या बुक्कीत ठार झाला पाहिजे माणूस .." हे ऐकून तो माणूस जरा भडकला .." तुम्ही समजता काय मला ..नुसत्या बुक्कीत देखील ठार करू शकतो मी ..लाल मातीत खेळलेला आहे ..एकावेळी चार चार जणांना फिरवू शकतो .".असे म्हणत त्याने एकदम पहिलवानी पवित्रा घेतला ..सगळे त्याच्या भोवती गोल करून उभे होते ..त्याने हाताच्या दंडावर ..मांडीवर शड्डू ठोकल्यासारखे केले ..आणि तयार झाला कुस्तीला ..त्याच्या वर्तनावरून समजत होते की त्याला तो नेमका कुठे आहे ..त्याला कुठे आणले आहे हे काहीच भान नव्हते ..तो शड्डू ठोकत शेरकर काकांना आव्हान देवू लागला ..' मला कुस्ती नाही येत ..कराटे येत असेल तुम्हाला तर लढू ' असे म्हणून शेरकर काकांनी त्याला अजून डिवचले ..तो पण लगेच ..तुम क्या समझे मेरेको ...कराटे का ब्लँक बेल्ट हु मै ..असे म्हणाला ..लगेच त्याने हवेत आडवे तिडवे हातवारे करत कराटे खेळण्याचा पवित्र घेतला ..हे त्याचे माकडचाळे पाहून आमची हसून हसून मुरकुंडी वळली ..एव्हाना एका कार्यकर्त्याने त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या ..तो त्या गोळ्या घ्यायला तयार होईना ..मग शेरकर काकांनी त्याला सांगितले " ये गोली लेनेके बादही मै लडूंगा तुमसे " ही मात्र लागू पडली ..' गोलीसे कौन डरता है..जो डर गया समझो मर गया " असे म्हणत मोठ्या शुराच्या अविर्भावात त्याने गोळी घेतली ..मग सुमारे तासभर शेरकर काका आणि त्याचा कल्ला सुरु होत्या ..हळू हळू गोळीचा परिणाम जाणवू लागला ..त्याच्या हालचाली शिथिल झाल्या . ..बोलता बोलता तो गादीवर आडवा झाला ..चक्क घोरू लागला दहा मिनिटात .. ! 

नंतर कितीतरी वेळ मी त्याच्या या असंबद्ध वर्ताना बद्दल विचार करत होतो ..दारू प्यायल्यावर माझे कधी असे माकड झाले नव्हते ..मला स्थळ ..काळ ..वेळ याचे नेहमीच भान राही ..याचे तर भलतेच होते ..त्याला आपण कुठे आहोत ..आजूबाजूला कोण आहे याचे देखील भान नव्हते ..सकाळी तो माणूस उठल्यावर त्याच्याकडे पहिले तर ..रात्रीची घटना एखादे स्वप्न असावे असे त्याचे वर्तन होते ...सकाळी अनोळखी चेहऱ्याने तो ..मी कुठे आहे ? मला कोणी आणले इथे ? ही कोणती जागा आहे वगैरे विचारात होता आसपासच्या लोकांना ..मी माँनीटरला विचारलेच त्याबद्दल ..तेव्हा त्याने जे सांगितले ते भयावहच होते ..दारू मुळे किवा मादक द्रव्यांमुळे बरेचदा अशी " ब्लँकआउट "ची अवस्था येवू शकते ..या अवस्थेत माणसाच्या मेंदूचे काम सुरु असते ..मात्र ते काम असंबद्ध पद्धतीने सुरु राहते ..आसपासची परिस्थिती ..लोक ..स्थळ ..काळ.. वेळ याचे भान हरपते ..बाकी सर्व अवयव कार्यरत असतात ..परंतु तो त्या अवस्थेत जे जे काही करतो ते त्याच्या स्मरणात अजिबात राहत नाही ..काही जण तर या ब्लँकआउटच्या अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..काही जणांना वस्त्रांचे भान राहत नाही ..किवा लघवी संडास यांचे भान सुटते ..काही जण नुसती रडारड करतात ..सारखे दुखःचे कढ येतात त्यांना ..काही जणांच्या बाबतीत ही अवस्था कमी तीव्रतेची असते ..म्हणजे रात्री आपण घरी कसे आलो हे सकाळी आठवत नाही ..मात्र तो घरी बरोबर आलेला असतो ..किवा रात्री कोणाशी काय बोललो ..शेवटचा पेग कोणत्या ठिकाणी प्यायलो ..आपली गाडी किवा स्कूटर कुठे ठेवली आहे हे सगळे त्याला सकाळी अजिबात आठवत आठवत नाही .. अश्या अवस्थेत तो जे जे वर्तन करतो ते त्याला सकाळी सांगितले तर तो कानावर हत ठेवतो ..मी असे काही केलेच नाही म्हणतो ..त्याला वाटते हे लोक आपण दारू सोडावी म्हणून उगाच भलते सलते आरोप करत आहेत आपल्यावर ..माँनीटर सांगत असलेली माहिती मला तंतोतंत पटली..मला देखील अनेकदा सकाळी रात्री काय काय घडले याचा तपशील काही केल्या आठवत नसे ..अनेकदा तर मी उठल्या उठल्या आपण स्कूटर बरोबर घरी आणली नाही नाही हे आठवत नसे ..मग आधी बाल्कनीत जावून मी स्कूटर जागेवर आहे किवा नाही हे तपासत असे..काही वेळा रात्री मी अलकाशी खूप भांडण केलेले असे ...रागाच्या भरात जेवणाचे ताट भिरकावलेले असे ..मात्र सकाळी अलका जेव्हा मला हे सांगे तेव्हा मला ते अजिबात आठवत नसे ..अलका उगाच काहीतरी तिखटमीठ लावून सांगतेय किवा मला घाबरवण्यासाठी बोलतेय असे वाटे .

परंतु ही अवस्था खूप प्यायल्याने येत असेल ना ? असे मी माँँनीटरला विचारले .. तेव्हा त्याने दिलेले उत्तर मला चिंतेत टाकणारे होते ..खूप प्यायले तरच किवा हलक्या दर्जाची दारू घेतली तरच असे होते असे अजिबात नाही ..हे प्रत्येकाच्या बाबतीत केव्हाही घडू शकते ..आपलं मेंदू काही वेळा दारूबाबत खूप संवेदनशील असतो ..प्रत्येक वेळी असे होतेच असे नाही ..मात्र केव्हाही हे होऊ शकते हेच खरे आहे ..काही वेळा एकदोन पेग नंतर देखील मेंदू जास्त उत्तेजित होऊन ही अवस्था येते ..तर काहीवेळा एकदोन क्वार्टर पिवून देखिल असले काहीच होत नाही ..शेवटी त्या वेळी त्याचा मेंदू दारूबाबत किती संवेदनशील आहे त्यावर ही अवस्था अवलंबून असते ..आणि मेंदूची संवेदनशीलता अनेकदा आपल्या भावनिक स्थितीवर अवलंबून असते ..त्यामुळे आपल्या बाबतीत असे कधीच होऊ शकणार नाही हे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे ..!

( बाकी पुढील भागात )

मानसोपचार तज्ञांची भेट !


मानसोपचार तज्ञांची भेट !  ( बेवड्याची डायरी -भाग २६ वा )

मला आता येथील वास्तव्यात आठवडा होत आला होता ..बहुतेक येथील सर्वांशी ओळखी झालेल्या होत्या ..केवळ दारूचेच व्यसनी नव्हे तर इथे निरनिराळी इतर व्यसने करणारे देखील लोक दिसले ..त्यापैकी काही व्यसनांची तर नावे देखील मी प्रथमतः ऐकली होती ..' व्हाईटनर ' .सुंघणारे...तसेच ' फोर्टविन ' व वेदनाशामक इंजेक्शने घेणारे ..एकाच्या तर दोन्ही हातावर खूप जखमा आढळल्या ..मी त्याला त्या जखमांचे कारण विचारले तर त्याने सांगितले की मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात हे लागले आहे ..जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत ..माझा यावर विश्वास बसत होता ..त्याच वेळी तेथे आलेल्या माँनिटरने मला माहिती पुरवली की हा खोटे बोलतोय ..या जखमा अपघाताने नव्हे तर इंजेक्शन घेताना त्याची सुई वारंवार ' आउट ' गेल्याने झालेल्या आहेत ..हा जे वेदनाशामक इंजेक्शन नशा म्हणून वापरतो ..त्याचे मिश्रण सिरींजमधून हाताच्या शिरेत घेताना ..घाईघाईत किवां शिरेचा योग्य अंदाज न आल्याने अनेकदा सुई प्रत्यक्ष शिरेत न जाता शिरेच्या बाजूला त्वचेच्या खाली खुपसली जाऊन ..तेथे याने सिरींज द्वारे सोडलेल्या मादक द्रव्याचा साठा होऊन गाठ तयार होते ..नंतर ती गाठ फुटून जखमा तयार होतात ...ज्या लवकर भरत नाहीत ..कारण याचे सतत अशी इंजेक्शने घेणे सुरु असते ..तसेच त्या जखमा बऱ्या होण्यासाठी योग्य पथ्ये देखील पाळली जात नाहीत ..काही वेळा शीर लवकर सापडत नाही ..तोवर हे लोक शीर सापडेपर्यंत सारखी सुई त्वचेत खुपसत राहतात ..त्यामुळे देखील अशा जखमा होतात ..हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला ..भयानकच होते हे ..मला तर साधे आजारी असताना देखील इंजेक्शन घेण्याची भीती वाटते ..इथे तर स्वतच्या नशेसाठी वारंवार सुई टोचून घेतली जात होती ..माँनीटरने पुढे सांगितले की ..जेव्हा वारंवार इंजेक्शन घेवून हातांच्या शिरा निकामी होतात तेव्हा मग पायांच्या शिरांचा देखोल वापर केला जातो ..पुढे त्या देखील निकामी होत जातात ..मग पोटातल्या शिरेत ..डोळ्याखालच्या शिरेत ..अगदी शेवटी शेवटी तर लिंगावरील शिरेत देखील हे मादक द्रव्य टोचून घेतले जाते ..माँनीटर हे सगळे सांगत असताना तो निर्लज्जपणे सगळे ऐकत मान डोलवत होता ..अजून माहिती म्हणून मी माँनीटरला ' व्हाईटनर ' बद्दल विचारले ..आपण ' इरेजर ' म्हणून जे कोरेस कंपनीचे ' व्हाईटनर ' वापरतो ..त्यात दोन बाटल्या असतात ...एका बाटलीत पांढऱ्या रंगाचा घट्ट द्राव असतो ..तर दुसऱ्या बाटलीत तो घट्ट द्राव प्रवाही करण्यासाठी ' थिनर ' असते ..ते थिनर विशिष्ट प्रकारच्या केमिकल पासून बनवले जाते ..तर ते थिनर एका रुमालात ओतून घेवून ..वारंवार तो रुमाल नाकाशी धरून त्याचा वास घेतले जातो ..त्यामुळे डोके बधीर होऊन ..नाश येते ..याची पुढची पायरी म्हणजे ते थिनर रुमालात न ओतता एका छोट्याच्या प्लास्टिकच्या पिशिवीत ओतून त्या पिशवीत नाक खुपसून दीर्घ श्वास घेत तो दर्प घेतला जातो ..त्या केमिकल मधील विषारी द्रव्ये मेंदूवर परिणाम करून नशा येते ..मला आठवले की वर्तमान पत्रात या बद्दल मी वाचले होते ..त्या ' व्हाईटनर ' वर आता बंदी येवून त्याऐवजी ' पेन इरेजर ' आलेत म्हणून ..मात्र बंदी येवूनही अनेक ठिकाणी हे ' व्हाईटनर ' जास्त किमतीत उपलब्ध होते असे समजले..बहुधा कमी वयाची मुले या व्यसनात अडकतात ...या नशेने वेड लागल्याचे किवा ओव्हरडोस होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे ..असे माँनीटरने सांगितले ..आजकाल शिक्षणासाठी बाहेर गावी होस्टेलवर राहणारे विद्यार्थी ..अगदी मुलीही ..तसेच दारूचा तोंडाला वास येतो म्हणून ..वास न येणारी नशा शोधणारे अनेक तरुण अशा प्रकारच्या मादक द्रव्यांच्या आहारी जात असतात ..ज्यात गांजा ..चरस ..अफू ..ब्राऊन शुगर ..व इतर अनेक मादक द्रव्ये येतात ..माँनीटरने व्यवस्थितच माहिती दिली मला .

आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने ...सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले ..माझेही नाव त्यात होते ..मलाही नकार द्यावासा वाटले ..परंतु विचार केला की जर मला मनापासून दारूच्या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर उपलब्ध असलेली सारी मदत घेतलीच पाहिजे ..माझा नंबर आल्यावर मी केबिन मध्ये गेलो ..तरुण हसतमुख मानसोपचार तज्ञांनी मला बसायची खुण करून माझ्या फाईल वर भरलेली माझी माहिती वाचली ..माझा रक्तदाब पहिला ..डोळ्यात टाँर्चचा प्रकाश टाकून डोळ्याच्या बाहुल्या तपासल्या ..मग मला .. किती वर्षांपासून दारू पिता ? ..किती पिता ? ..दारू प्यायल्यावर घरी भांडणे ...शिवीगाळ ..मारपीट होते का ? दारू खेरीज अन्य मादक पदार्थ घेता का ?असे प्रश्न विचारले ..मी उत्तरे देत गेलो ..मग सध्या झोप शांत येते का ? ..स्वप्ने पडतात का ? ..कानात काही आवाज येतात का ? भविष्यकाळाची खूप चिंता वाटते का ? ..पत्नीच्या वागण्याचा काही संशय येतो का ? कोणी तुमच्याशी अदृश्य पणे बोलते आहे असे वाटते का कधी ? ..खूप राग येतो का ? निराश वाटते का ? असे वेगवेगळे प्रश्न विचारले ..मी जमेल तशी उत्तरे दिली ...त्यांनी फाईल वर काहीतरी लिहले ..म्हणाले बरे झाले तुम्ही लवकर उपचारांना आलात ..तुम्ही दिलेल्या उत्तरावरून अजून तरी तुमचे गंभीर प्रकारची मानसिक नुकसान झालेय असे वाटत नाही ..अर्थात तुम्ही खरी उत्तरे दिली असतील तर ..डॉक्टरशी खरे बोलावे नेहमी ..कारण त्यामुळेच तो आपल्याला योग्य ती मदत करू शकेल ..तुम्हाला मी तुमची अवस्थता तसेच भाविनिक चंचलता किवा भावनिक तीव्रता कमी करण्यासाठी एक गोळी लिहून देतोय ..ती सध्या घ्या नियमित ..मग तुमच्या डिसचार्ज नंतर ठरवू गोळी बंद करायची की नाही ते ..

मी मानसोपचार तज्ञांना भेटून बाहेर पडताच ..बाहेर नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या काहींनी मला घेरले ..काय म्हणाले ? काय विचारतात ? असे प्रश्न विचारू लागले . ..जसे नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी आत जाऊन बाहेर आलेल्या उमेदवाराला बाकीचे उमेदवार.. काय काय ? विचारले ते माहित करून घेतात तसेच होते ..खरे तर मानसोपचार तज्ञ जे जे विचारतात त्यांची खरी उत्तरे द्यायची मानसिक तयारी असेल तर ..आधी सराव करून जाण्याची गरजच नाही ..प्रत्येकाची विचार करण्याची ..वागण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ..त्यानुसार त्यात काही वावगे आढळले तरच मानसोपचार तज्ञ गोळ्या देणार असतात ...बाहेर रांगेत बसलेल्या लोकांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून मला हसू येत होते .

( बाकी पुढील भागात )

Saturday, April 12, 2014

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल !( बेवड्याची डायरी - भाग २५ वा )
ईश्वरी शक्तीबद्दल सांगताना सरांनी एखाद्या विशिष्ट धर्माच्या ..विशिष्ट पंथाच्या ईश्वराचा उल्लेख न करता प्रत्यक्ष सृष्टीला ..निसर्गाला ..निसर्ग नियमांना ईश्वर समजणे ..हेच ईश्वराच्या सर्व व्यापकतेला धरून आहे हे स्पष्ट करत आज ..हा सर्व व्यापक ..सर्वसमावेशक ईश्वर प्रत्येकाच्या जीवनात कशा रीतीने कार्यरत आहे हे सांगितले ..प्रत्येक जीवाचा जन्म निसर्गनियमांना अनुसरूनच होत असतो .. मानवाच्या बाबतीत जन्मानंतर त्या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी घेणारे त्याचे आई -वडील .. त्याचे या जगात प्रवेश केल्यानंतरचे प्रथम ईश्वर मानले पाहिजेत .. नंतर त्याची भावंडे ..जी त्याला प्रेम देतात ..खेळण्यात सवंगडी म्हणून त्याच्या सोबत असतात ..जी त्याच्या दुखल्या दुखल्या खुपल्याला त्याला मदत करतात ..आधार देतात ..मग त्याच्या आयुष्यात येणारे त्याचे गुरुजन.. जे त्याला स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे ज्ञान देतात ..मोठा झाल्यावर त्याची पत्नी ..जी आई प्रमाणेच त्याची काळजी घेते ..त्याला प्रेम देते ..त्याचे जीवन आनंदी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते ....शेवटी माणूस म्हातारा झाला की त्याला आधार देणारी त्याची मुले ही देखील ईश्वराच्या व्याख्येत समाविष्ट होतात ..सर्वात शेवटी हा संपूर्ण समाज येतो ईश्वराच्या व्याख्येत ..आपले मित्र ..शुभचिंतक ..स्नेही ..जे जे लोक आपण व्यसनमुक्त व्हावे म्हणून इच्छा ठेवतात ते सगळे या व्याख्येत येतील ..परस्परांना आनंदाने जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी समाजातील प्रत्येक घटक मदत करत करत असतो ..अश्या पद्धतीने जर आपण ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ..ईश्वराला समजून घ्यायला कुठे दूर जाण्याची गरज नाही हे स्पष्ट करत सर म्हणाले की .आपल्या व्यसन करण्याला यातील बहुतेक लोकांनी विरोध केला तरीही आपण व्यसन करत राहिलो याचे प्रमुख कारण की या लोकांना आपण ईश्वर मानले नाही ..हे लोक आपल्या भल्याचे सांगतात हे समजून न घेता ..केवळ मला विरोध करतात म्हणून त्यांना शत्रूच्या यादीत टाकले होते आपण ..सर नीट उलगडून सांगत गेले तसे मला थोडेफार समजत गेले .. जर आपण निसर्गनियम ..आपले नातलग ..स्नेही ..शुभचिंतक ..कौटुंबिक नियम ..सामाजिक नियम ..व्यवस्थित समजून घेतले तर ईश्वर समजण्यास सोपा जाईल ..ईश्वर प्रत्येक जीवात आहे ..प्रत्येक प्राण्यात आहे ..त्यामुळे अदृश्य अशा ईश्वराची पूजा करून ...त्याला प्रसन्न करून घेवून ..नवस बोलून ..आपल्या आयुष्यात काहीतरी चत्मकार होईल अशी वाट पाहत बसण्यापेक्षा ..आपण जर आपले जीवन आहे तसे स्वीकारून ..ते अधिक समृद्ध ..आनंदी ..करण्यासाठी या ईश्वराची सकारात्मक मदत घेत गेलो तर नक्कीच व्यसनमुक्त राहता येईल ...
सर्वात शेवटी त्यांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसला अभिप्रेत असलेल्या उच्चशक्तीची किवा प्रार्थनेत उल्लेखलेल्या ' गाँड ' या शब्दाची व्याख्या सांगितली ..G-म्हणजे good , O -म्हणजे orderly .आणि D - म्हणजे director ...हे सांगत ..याचा संपूर्ण शब्द होतो ..' गुड ऑर्डरली डायरेक्टर ' ...आपले जीवन चांगले यशस्वीपणे ..समर्थपणे ...धैर्याने ..जगण्यासाठी दिशादर्शन किवा दिग्दर्शन करणारी कोणतीही व्यक्ती ..तत्व ..नियम ..विचारधारा ..या सर्वांचा या ' गाँड ' मध्ये समावेश होतो असे सांगितले ..एकदा आपण आपले स्वता:चे जीवन ..केवळ स्वतच्या इच्छाशक्तीच्या बळावर ..बुद्धीच्या बळावर ..आर्थिकतेच्या बळावर यशस्वीपणे जगू शकत नाहीय हे मान्य केले की मगच आपल्याला या ईश्वरी शक्तीची मदत घेण्याची मानसिक तयारी करता येते ..या ईश्वरी तत्वाला समजून घेवून त्याच्या अनुषंगाने जीवन जगण्यास प्रेरणा मिळू शकते ..सरांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यावर कोणाला काही प्रश्न आहेत का असे विचारले ..आम्ही सगळे अंतर्मुख झालो होतो ..काय विचारावे याचा विचार करत होतो ..एकाने विचारले " सर ..मग निसर्गानेच अनेक प्रकारच्या मादक वनस्पती निर्माण केल्या आहेत .ज्या पासून गांजा ..भांग ..अफू ..कोकेन असे मादक पदार्थ निर्माण होतात ..तसेच ज्यापासून दारू तयार होते ते पदार्थ पण निसर्गानेच निर्माण केले आहेत ..त्यांना पण ईश्वर समजायचे का ? " ..त्याच्या प्रश्नाने सर्व हसू लागले ..अतिशय चाणाक्षपणे त्याने हा प्रश्न विचारला होता ..सरांनी लगेच उत्तर दिले " तू नावे घेतलेल्या सर्व वनस्पती निसर्गाने निर्माण केल्या आहेत हे एकदम बरोबर आहे ..मात्र निसर्गाचा यात मानवाला मदत व्हावी हाच हेतू होता ..या सर्व वनस्पती आयुर्वेदात किवा अँलोपथीमध्ये विशिष्ट प्रकारच्या आजारात औषधी म्हणून वापरल्या जातात... विशिष्ट मानवी आजार बरे करण्यास हातभर लावतात ..या वनस्पितींचा वापर आपण एखाद्या आजारासाठी अथवा आजार बरा होण्यासाठी न करता ..नशेसाठी ..कल्पनेच्या जगात जाण्यासाठी ..कृत्रिम आनंद मिळवण्यासाठी करत गेलो तर नक्कीच या आरोग्याला हानिकारक ठरतात ..दारूचेही तसेच आहे ..काही प्रकारच्या औषधांमध्ये अल्कोहोल अगदी सौम्य प्रमाणात वापरले जाते ..मात्र दारुड्याने आजार नसताना देखील याचा वापर सुरु केला ..हे स्वैर इछेचे लक्षण आहे ..आता तर आपण या औषधांचा इतका गैरवापर केलंय की ती औषधे वारंवार घेणे हाच आजार जडला आहे आपल्याला ..त्यामुळे यापुढे एकदाही अश्या मादक औषधांचे सेवन न करणे हेच पथ्य आपल्याला पाळायला हवे " सरांच्या उत्तराने त्याचे समाधान झाले ..
समूह उपचार संपल्यावर मी वार्डच्या बाजूच्या केबिनमध्ये असलेल्या वाचनालयात गेलो ..सरांनी उल्लेख केलेल्या अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची पुस्तके एकदा वाचावी असे मनात होते..लायब्ररीत चार पाच कपाटे होती..ज्यावर ..अध्यात्म ..आरोग्य ...आत्मचरित्र ..कादंबरी ..धार्मिक.. अशी लेबले लावलेली दिसली .. बरीच पुस्तके होती तर इथे ..मला वाचनाची आवड असल्याने बराच वेळ पुस्तके पाहत वेळ घालवला ..चला लायब्ररीमुळे माझा फावला वेळ चांगला जाणार होता ..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ' माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधन विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ' असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
( बाकी पुढील भागात )

डोक्याला खुराक ..विचारांना चालना !


डोक्याला खुराक ..विचारांना चालना ! ( बेवड्याची डायरी - भाग २४ वा )

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता ..मला मिळालेल्या २०० पानी वहीवर ...दोन दिवसांपूर्वीच मी नाव टाकून ..एका प्रश्नाचे उत्तर त्यात लिहिले होते ..ते पुन्हा एकदा वाचले ..अक्षर खूप वाईट आलेले होते माझे ..आज लिहायला सुरवात करण्यापूर्वी मनात प्रश्न आला की डायरी लिहिणे येथे सक्तीचे का असावे ? ...लगेच मी माँनीटरला याबाबत विचारलेच ..तो हसून म्हणाला ..जवळ जवळ येथे दाखल होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतोच ..कारण बहुधा सर्व व्यसनी लोकांना लिहायचा कंटाळा असतो ..तसेच स्वतःबद्दल काही खाजगी लिहायचे म्हंटले की माणसाच्या अजूनच जीवावर येते ..डायरी लिहिणे किवा दैनंदिनी लिहिणे हे खरे तर एक मानसिक उपचारच असतो ..बोलताना माणूस काहीही बोलून जाऊ शकतो ..नंतर ते नाकारूही शकतो ..पण लेखनाचे तसे नाही ..लिहिताना विचार करून लिहावे लागते ..आपल्या मनातील गोष्टी सुसंगतपणे कागदावर उतरवणे ही एक मानसिक शिस्त आहे ..तुम्ही त्यामुळे सुसंगत विचार करू शकता ..बोललेले लक्षात राहीलच याची खात्री नसते ..परंतु लिहिलेले सगळे तुम्हाला आठवण करून देण्यास पुरावा असतो ..शिवाय तुम्ही सर्व येथे काय शिकले ते बाहेर गेल्यावरही तुम्हाला वाचता येईल डायरी लिहिल्यामुळे ..जेव्हा जेव्हा व्यसनाची आठवण येईल ..खूप निराश ..अस्वस्थ वाटेल..तेव्हा तेव्हा इथे लिहिलेली डायरी उघडून वाचलीत तर येथे शिकलेले सगळे तुम्हाला व्यसनमुक्ती टिकवण्यास तसेच नव्या जोमाने जीवन जगण्यास मदत करू शकेल .. मी आजूबाजूला पहिले तर बहुतेक सगळे जण डायरी लिहायला बसलेले होते ..गम्मत वाटली ती त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ..अगदी कष्टप्रद चेहऱ्याने ..नाईलाजाने हे सगळे लिहायला बसले होते हे उघड दिसत होते ..शेरकर काका उगाचच इतरांच्या वहीत डोकावत फिरत होते ..त्यांनी वहीत डोकावताच ते ज्याच्या वहीत डोकावले ती व्यक्ती ताबडतोब वही मिटून टाकत असे ..ते पाहून माँनीटरने शेरकर काकांना टोमणा मारला " काका ..आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून .. हे बंद करा आता ..तुम्ही पण लिहायला बसा " असे म्हणत त्यानाही लिहायला बसवले ..

मी लिहायला दिलेला प्रश्न पुन्हा पहिला .. ' आपण निसर्ग नियमांचे पालन करण्यात कोठे चूक केलीय असे आपणास वाटते ? '.. डोक्याला ताण देवून विचार करायला हवा होता ..सरांनी जे निसर्गनियम सांगितले होते ..त्याबाबतच लिहावे लागणार होते ..मला आठवले ..निसर्गनियमानुसार ..अन्न ..वस्त्र ..निवारा या मानवाच्या मूळ किवा प्राथमिक गरजा असतात ..त्यात मी दारू जोडली होती ही चूकच होती माझी ..दारू ही मानवी शरीरची गरज नसतानाही मी तिला गरज बनवले होते ..सुरवातीला आनंद ..मौज ..अशी कारणे देत व नंतर दुखः ..तणाव ..राग ..निराशा ..या वेगवेगळ्या कारणांनी मी दारूच्या आहारी जावून तिला जीवनावश्यक गरज बनवले ..पुढे पुढे तर ' अन्न ' ही गरज दारूमुळे संम्पुष्टात येवू लागली होती दारूमुळे ..मी पटापट लिहू लागलो ..निसर्गनियमानुसार दुखः -आनंद ..मिलन - विरह .हे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या कालखंडात येत असते ..ते न स्वीकारता मी मला फक्त आनंदच मिळाला पाहिजे या अट्टाहासाने जगत राहिलो ..मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे मला जमलेच नाही .. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीने घडली पाहिजे या विचाराने मी सतत निराश ..वैफल्यग्रस्त होत गेलो ..जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले तेव्हा तेव्हा दारू पिवून स्वतचे खोटे समाधान करून घेतले ..माझे दारू सेवन करणे ही एक प्रकारची बंडखोरीच होती माझी ..निसर्गात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळेल हे लक्षात घेता मी बेबंद पणे ..बेदरकर पणे दारू पीत राहिलो ..माझे काहीच नुकसान होणार नाही या भ्रमात ..आणि हळू हळू ..शारीरिक ..मानसिक ..आर्थिक ..कौटुंबिक व सामाजिक पातळी वर माझे नुकसान होत गेले तेव्हा आपण करत असलेल्या क्रियेची ही प्रतिक्रिया आहे हे न समजता ..सर्वाना दोष देत गेलो ..भांडत गेलो इतरांशी ..शेवटी शेवटी तर जगात सर्वात जास्त दुखः माझ्याच वाट्याला आलेय ..मी कमनशिबी आहे ..माझ्यावर अन्याय होतोय या भावनेत गुरफटलो ..सतत नशिबाला दोष देत गेलो आणि दारू पीत राहिलो ..माझ्या जीवनातील अडचणी ..समस्या ..तणाव ...हे आव्हान म्हणून स्वीकारून त्यावर मला मात करता आली असती ..मात्र तसे न करता मी दारूचा आधार घेतला ..

एकदा लिहायला सुरवात केली तसे तसे मला पटापट सुचत गेले ..शेवटी लिहिले की निसर्गनियमानुसार जगणे मला मान्य नव्हते ..आयुष्यातील प्रत्येक घटना माझ्या मनासारखी घडली पाहिजे असे मला वाटे ..म्हणूनच मला वारंवार निराश व्हावे लागले.. समर्थ रामदासांनी म्हंटले आहेच ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ..विचारे मना तूच शोधून पाहे ' त्या नुसार जगात प्रत्येकच्या वाट्याला कोणते तरी दुखः आहेच ..तसेच कोणते तरी सुखही आहे ..मी मला मिळणारे सुख लक्षात न घेते दुखा:चा बागुलबुवा बनवून ..दारूचे कृत्रिम सुख मिळवत गेलो ..परिणामी अधिक अधिक दुखी: झालो ..दारू पिणे किवा व्यसन करणे हा जर दुखा:वर उपाय असता ..तर मग सर्वानीच दारू प्यायला हवी होती ..कारण सर्वांच्याच वाट्याला समस्या आणि दुखे: आहेत..सुमारे अर्धा तास कसा उलटून गेला लिहिण्यात ते समजलेच नाही .. अगदी शेवटी लिहिले कि या पुढे जीवनातील समस्या ..संकटे ..अडचणी यांचे आव्हान स्वीकारायला मला शिकले पाहिजे ..तसेच माझ्या प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया मला निसर्गाकडून मिळणार आहे हे लक्षात ठेवून या पुढे प्रत्येक कृती करताना ती सकारात्मक असली पाहिजे याचे भान ठेवणे मला आवश्यक आहे ..म्हणजेच आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे या विश्वासाने कोणतेही कर्म करताना नीट विचार करूनच वागावे लागेल मला ..एकदाचे लिहून झाले तसे एकदम सुटल्या सारखे वाटले ..माझ्या बाजूलाच शेरकर काका बसले होते लिहित ..मी गमतीने त्याच्या वहीत डोकावलो ..त्यांनी पटकन वही बंद केली .

( बाकी पुढील भागात )

Monday, April 7, 2014

ईश्वरी संकल्पना ....उच्चशक्ती !


ईश्वरी संकल्पना ....उच्चशक्ती !(बेवड्याची डायरी - भाग २३ वा )

सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे चमत्कार घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला...पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे ..तसेच प्रत्येक धर्माने त्या स्वामीला अथवा ईश्वराला प्रसन्न करण्याचे ..त्याची पूजा अर्चा करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत ..तो एकच आहे ..त्याला मानवानी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहून धर्मात ..पंथात वाटला आहे ...असेही म्हंटले जाते..गोंधळ हा असतो की ज्याला कोणी प्रत्यक्ष पहिला नाहीय ..तरीही ' तो ' आहे ..त्याचे अस्तित्व आहे हे मानले जाते ..अशा या परमेश्वराला जाणून घेणे म्हणजे एक कसरतच आहे ...या ईश्वराची साकार सगुण आणि निराकार निर्गुण अशी दोन रूपे हिंदुत्वात मांडली गेली आहेत ..आपण खूप खोलात न जाता किवा या कल्पनेचा कीस न काढता सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने हे समजून घेतले पाहिजे ..त्यासाठी जर शास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर केला तर धार्मिक वाद न उदभवता किवा ईश्वर आहे किवा नाही हा वाद न घालता आपल्याला कोणीतरी उच्च्शक्ती या सृष्टीत कार्यरत आहे ..नियमबद्ध सुसूत्र पद्धतीने त्याचे कार्य चालते ..तसेच आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणारे त्या शक्तीचे नियम आपण समजून घेवू शकू ..या शक्तीला आपण निसर्ग असे म्हणूयात ..निसर्ग म्हंटले की देव ..अल्लाह ..गाँड ...असे सगळेच यात येतात .. या निसर्गाचे नियम आपण समजावून घेतले... स्विकारले नक्कीच निसर्गाच्या मदतीने आपल्याला आपले जीवन व्यसनमुक्तीकडे ..शांती ..समाधान ..प्रसन्नतेकडे सहजतेने नेता येईल ..यालाच उच्चशक्तीची मदत घेणे म्हणता येईल ..असे सांगत सरांनी निसर्गनियमांचे पालन ..त्यांची अपरिहार्यता ..याबद्दल ..सांगण्यास सुरवात केली .

१ ) सृष्टीची निर्मिती झाल्यावर सर्व जीव सृष्टी निर्माण होण्यास होण्यास पृथ्वी ..अग्नी ..जल... वायू ..आकाश ही पंचमहाभूते कारणीभूत आहेत हे शास्त्राला मान्य आहे ..चल..अचल , सजीव -निर्जीव , अशा सर्व घटकांच्या निर्मितीला ही पंच महाभूते जवाबदार आहेत ..आपले शरीर देखील याच घटकांनी बनलेले आहे ..या पंच तत्वांचे प्रमाण शरीरात विशिष्ट असे आहे ..जेव्हा जेव्हा ते प्रमाण कमी जास्त होते तेव्हा ..आजार निर्माण होतात ..

२) जन्म - मृत्यू , भरती- ओहोटी , दिवस- रात्र , अपघात ..नैसर्गिक आपत्ती ..हे निसर्ग नियम आहेत ..तसेच सुख -दुखः , मिलन - विरह , बालपण ..तारुण्य ..प्रौढावस्था ..जरा ..व्याधी ..मृत्यू या अवस्था देखील या निसर्गनियमांवर आधारित आहेत ...मानव जेव्हा जेव्हा या नियमांना नाकारतो ..हे नियम समजून घेत नाही ..पालन करत नाही ..या नियमांना आव्हान देतो ..तेव्हा तेव्हा त्याला संकटांचा सामना करावा लागतो .

३) इतर प्राणी आणि मानव यातील प्रमुख फरक हा आहे की निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा कुशाग्र अशा बुद्धीचे वरदान दिले आहे तसेच त्या बुद्धीचा वापर करून जीवन अधिक सुखकर ..आरामदायी करण्यासाठी ..चातुर्य ..आकलन क्षमता ..योग्य असे उपयुक्त अवयव दिले आहेत .परंतु मानवाने त्याच्या निसर्गदत्त अशा काम ..क्रोध ..लोभ ..मद ..मोह ..मत्सर या विकारांमुळे स्वतच्या अहंकाराला खतपाणी घालून सारी सुखे मिळावी या अट्टाहासाने बुद्धीचा गैरवापर करून स्वतःसाठी आणि सर्व सृष्टीसाठी अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत .

४) या सृष्टीत ' आपोआप ' असे काहीच घडत नाही तर प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कार्यकारण भाव असतो ..म्हणजेच न्यूटनच्या क्रिया - प्रतिक्रिया या सिद्धांतानुसार हे कार्य चालते ...आपल्या प्रत्येक कृतीची काहीतरी प्रतिक्रिया निसर्गात निर्माण होत असते ..जर योग्य कृती असेल तर योग्य अशी प्रतिक्रिया मिळते ..विपरीत कृती करणाऱ्यांना विपरीत प्रतिक्रिया मिळते या प्रतिक्रिया भावनिक अथवा भौतिक असू शकतात .. ..राग.. द्वेष...प्रेम ..स्नेह ..जिव्हाळा ..या प्रकारच्या सकारात्मक किवा नकारात्मक भावना देखील प्रतिक्रिया निर्माण करतात ... ' कर्म आणि त्याचे फळ ' याच प्रकारचा सिद्धांत आहे हा ..फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की काही क्रीयांना ताबडतोब प्रतिक्रिया मिळते ..तर काही किर्यांचे फळ निर्माण होण्यास वेळ लागतो ..मात्र प्रतिक्रया अथवा फळ मिळणार हे नक्की ...आपण व्यसन करायला सुरवात केल्यावर ताबडतोब त्या विपरीत कृतीचे फळ आपल्याला मिळाले नाही ..तर कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होत गेले ..ग्लोबल वाँर्मिंग हे देखील मानवाने निसर्गनियम समजून न घेता स्वैर वर्तन केल्याचेच कालांतराने मिळणारे फळ आहे ..किवा एखादे फळ झाड आपण लावले कि जसे ताबडतोब त्याला फळे येत नाहीत ..त्याप्रमाणे चांगल्या कर्माचे फळ मिळण्यास देखील अवधी द्यावा लागतो .

५) या निसर्ग नियमांना कोणीही अपवाद नाहीय ..जेव्हा जेव्हा निसर्गनियम मोडले जातील ..नाकारले जातील ..पायदळी तुडवले जातील ..तेव्हा तेव्हा मानवाला दुखां:चा सामना करावाच लागेल ..म्हणून या निसर्ग नियमांना स्वीकारून ..योग्य प्रकारे समजून घेवून आपण स्वत:चे जीवन अधिक सुखी करू शकतो .

हे नियम सांगत सरांनी आता आपल्या व्यसनाधीनतेशी किवा व्यसनमुक्तीशी या नियमांचा कसा संबंध येतो ते उद्या सांगतो असे म्हणून समूह उपचार थांबवला ..आम्हाला सर्वाना डायरीत लिहायला एक प्रश्न दिला ' आपण निसर्गनियमांचे पालन करण्यात कोठे कोठे चूक केली असे असे आपल्याला वाटते ? '..सगळे जरा अवघडच वाटले मला ..पण थोडा थोडा उजेड पडत होता .

( बाकी पुढील भागात )

मदत मागणे ..मदत घेणे !


मदत मागणे ..मदत घेणे ! ( बेवड्याची डायरी - भाग २२ वा )

आज सकाळी मला अगदी प्रसन्नपणे जाग आली ..बहुतेक शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा ..उठल्याबरोबर अगदी फ्रेश वाटत होते ..शांत झोप झाल्याचेच हे लक्षण ..दारूच्या नशेत झोपल्यावर सकाळी उठतांना खूप जीवावर येई ..अंग जड पडलेले ..चुरचुरणारे डोळे ..डोके सुन्न ..अशी अवस्था असे ..शिवाय उठल्या बरोबर आज दारूचा बंदोबस्त कसा होईल ..पैसे कोठून आणायचे ..काल रात्री नशेत अलकाशी केलेलं भांडण ..हे सर्व आठवायचे आणि अंथरुणातून उठूच नये असे वाटायचे ..पुन्हा आता उठून कामावर जायचे ..दिवसभर ऑफिसमध्ये मान मोडून काम ...सहकाऱ्यांच्या कुत्सित मुद्रा ..वगैरे सगळे सगळे नकोसे होई ..पटापट तोंड धुवून मी अंघोळ उरकली ..सकाळी सकाळी मी एकदम अंघोळ वगैरे करून पी .टी. ला तयार झाल्यावर शेरकर काकांनी विचारलेच .." विजयभाऊ काय विचार आहे आज ? ..घरी जाणार की काय ? "..त्यांना हसून म्हंटले ' आता काही दिवस हेच घर समजायचे ..इथे सगळे शिकून मगच बाहेर जायचे असे ठरवलेय "..माझ्या उत्तराला त्यांनी हसून टाळी दिली ..वर टोमणा मारला ..म्हणजे कायमचे राहणार की काय इथे ? मी देखील त्यांना टोला दिला " त्यात काय विशेष ? तुम्ही आहातच की सोबतीला " हा टोला त्यांना लागला असावा ..नुसतेच गालातल्या गालात हसत चूप बसले ...

पी.टी आटोपून चहा घेताना ..बाजूला बसलेल्या एकाने त्याच्या लॉकर मधून त्याच्या पत्नीने काल आणलेला चिवडा आणला ..मलाही चिवडा घ्या असा आग्रह करू लागला ..मला आश्चर्य वाटले .. काल याचे पालक भेटायला आल्यावर याने खूप तमाशा केला असे ऐकले होते ..हा म्हणे पत्नी भेटायला आल्यावर सुमारे १० मिनिटे नुसताच तिच्या शेजारी बसून होता ..ती बिचारी बडबड करत होती ..हा घुम्यासारखा बसलेला ..मग म्हणाला ..झाले ना तुझे समाधान ?.. पंधरा दिवस राहीलोय मी इथे .... सगळे शिकलो ..यापुढे दारू पिणार नाही असे वचन देतो तुला ..आता घरी घेवून चल मला..नाहीतर मी कायमचा इथे रहातो ..तू सांभाळ मुले ..माझी नोकरी ..ती हबकलीच बिचारी ...तिला भेटण्या पूर्वी सरांनी कल्पना दिली असावी की ते घरी घेवून चल म्हणून हट्ट करतील ..मात्र अगदी या पातळीवर येऊन धमक्या देतील असे वाटले नसावे तीला..ती रडू लागली ..ते पाहून एका कार्यकर्त्याने याला विचारले देखील काय झाले म्हणून ..तर हा म्हणाला की " ती मला घरी चला म्हणतेय ..आणि मी म्हंटले की अजून काही दिवस रहातो म्हणून तिला वाईट वाटले "..याने कार्यकर्त्याला पाहून एकदम पलटी मारली होती ..शेवटी सर्वाना समजलेच कि हा हट्ट करतोय घरी जाण्याचा ..याला सरांनी समजावले ..मग शांत झाला ..मात्र पत्नीने घरून याच्यासाठी आणलेल्या खाण्याच्या वस्तू घेणे याने नाकारले होते ..सरांनी मग ते पदार्थ ऑफिस मध्ये ठेवून घेतले ..पत्नीची समजूत घालून तिला पाठवले ..नंतर एक तासाने हा ऑफिस मध्ये गेला ..आणि ' सर अहो तिची गम्मत करत होतो मी ' ..असे स्पष्टीकरण देवून ..ते खाण्याचे सामान परत घेवून आला होता ...मी त्याला नम्रपणे नकार देवून ..तेथून उठलो .

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे ..अल्कोहोलिक्स अँँनाँनिमसच्या पहिल्या पायरी मध्ये जसे आपण व्यसनी झाल्याची मनोमन काबुली देणे आणि व्यसनामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतोय हे समजून घेण्यास सांगितले आहे ..तसेच पुढे दुसऱ्या पायरीत म्हंटले आहे " आम्ही या विश्वासाप्रत पोचलो की आमच्याहून उच्च असलेली शक्तीच आम्हाला पुन्हा गमावलेले शहाणपण मिळवून देण्यास मदत करेल " याचा अर्थ स्पष्ट आहे की आपणच जगातील सर्वात शक्तिशाली ..बुद्धिमान ..वगैरे नसून आपली समस्या सोडवण्यासाठी दुसरा कोणीतरी आपल्याला मदत करू शकतो यावर विश्वास ठेवणे होय ..अगदी जन्म झाल्यापासून कोणा ना कोणाच्या मदतीनेच आपण मोठे होत गेले आहोत ..हे सत्य आपण नाकारता कामा नये ..तसेच व्यसना पासून मुक्ती मिळावी यासाठी निसंकोच मदत मागितली पाहिजे ..जसे इतर शारीरिक आजारात आपण डॉक्टर ..औषधे यांची मदत घेतोच ..मग हा तर शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा आजार आहे ..अल्कोहोलिक्स अँनानिमसची किवा व्यसनमुक्ती केंद्राची ..समुपदेशकाची ..कुटुंबियांची व्यसनमुक्तीसाठी मदत घेण्यास कमीपणा वाटून घेवू नये ..

( बाकी पुढील भागात )