Thursday, April 17, 2014

स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे !


स्वैराचार ..स्वतच्या इच्छेने जगणे ! ( बेवड्याची डायरी - भाग २८ वा )

अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या दुसऱ्या पायरीत सरांनी ईश्वर किवा उच्च शक्तीचे स्वरूप ...तसेच प्रत्येकाच्या जिवनात ती उच्चाशक्ती निसर्ग ..नातलग ..समाज यांच्या रूपाने कशी अस्तित्वात आहे हे मागच्या वेळी उलगडून सांगितले होते ..मला ते पटलेही होते ..एखादा विशिष्ट देव ..धर्म ..बाजूला ठेवून आपल्यावर प्रेम करणारे नातलग ..आपल्याला जीवन आनंदीपणे व्यतीत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करणारा समाज ..नैसर्गिक ..कौटुंबिक अथवा सामाजिक नियम ..इतकेच काय पण आपण देशात रहातो त्या देशाचे कायदे हे सर्वच ईश्वर या व्याख्येत मोडत असतात ..या सर्व गोष्टी आपल्याला मर्यादेने जगण्यास शिकवतात ..निसर्गाने प्रत्येक जीवाला काही क्षमता दिलेल्या आहेत तशाच काही मर्यादा देखील घातल्या आहेत ..या मर्यादा जे लोक मान्य करत नाहीत ते बंडखोरी करतात ..स्वतच्या मर्जीने जीवन व्यतीत करू इच्छितात ..त्यामुळेच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो ..हे नियम जाचक वाटून ते क्रोधीत होतात ..निराश ..वैफल्यग्रस्त होतात ..त्यांचे जीवन जगणे अधिक अधिक कठीण होते ...आपले सगळे अहंकार बाजूला ठेवून ..आपल्या मर्यादा समजून घेवून ..या ईश्वरी शक्तीला समजून घेतले तर ..या शक्तीला सहकार्य करत नक्कीच आनंदीपणे जगणे अधिक सोपे होते ..

आजच्या समूह उपचारात सरांनी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या तिसऱ्या पायरीवर चर्चा करण्यास सुरवात केली ..तिसऱ्या पायरीत म्हंटले आहे की.. ' आम्ही आमच्या इच्छा व जिवन आम्हास समजलेल्या ..उमगलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला ' ..ही पायरी वाचून सरांनी एक प्रश्न विचारला ..' आपल्या पैकी कोणा कोणाला स्वताचे जिवन हे आपण स्वतः निर्माण केले आहे असे वाटते ? त्या लोकांनी हात वर करावा ' ..कालच दुसऱ्या पायरीबद्दल समर्पक चर्चा झालेली असल्याने कोणीच हात वर केला नाही ..सगळ्यांना किमान आपले जिवन आपण स्वतःनिर्माण केलेले नाहीय हे समजले असावे बहुतेक ..सर हसले ..छान ..म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे ..की आपलं जन्म होण्यास ..आपले पालनपोषण होण्यास ..आपले योग्य पद्धतीने शिक्षण होण्यास .. कारणीभूत असणारे अनेक घटक आहेत जे आपल्याला मदत करीत गेले ..तरीही जेव्हा पासून आपल्याला समज आली अथवा आपला ' स्व ' म्हणजेच ' मी ' जागृत झाला तेव्हापासून आपण विविध प्रकारच्या इच्छा जोपासण्यास सुरवात केली ..त्या इच्छापूर्तीचा आग्रह धरला ..त्या इच्छापुर्तीतच आपले सुख दडले आहे असा आपला समज होता ..आपले खाणेपिणे ..कपडे घालणे ..मित्र निवडणे ..आवडी निवडी ..अथवा आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवणे ...असे सगळे अधिकार आपण सर्वांनी अगदी नीटच गाजवण्याचा प्रयत्न केला ..जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर कुटुंबीयांनी मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला अथवा त्यांची मर्जी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखे वाटले आपलं ' स्व ' दुखावला गेला ..मग आपण बेदरकारपणे दुरुत्तरे करू लागलो ..घरातील मोठ्या माणसांच्या ..नातलगांच्या सूचनांचा अव्हेर करू लागलो ..आपल्याला अपेक्षित असलेले सुख ..आनंद ..शोधण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग करत गेलो ..एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जगावे असे वाटणे स्वाभाविक आहे.. मात्र आपल्या इच्छा आपल्या भल्याच्या आहेत की नाहीत हे समजण्याची आपली क्षमता नसल्याने .. आपल्या आयुष्यात दुर्दैवाने व्यसनांचा शिरकाव झाला ..तंबाखू ..दारू ..तसेच इतर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये ' अॅडीक्टीव्ह पाॅवर ' म्हणजेच ' सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करून घेण्याची क्षमता ' असल्याने ..नकळत त्या पदार्थांच्या आहारी गेलो ..पाहता पाहता आपण व्यसनाधीनता या गंभीर आजारात अडकलो ..आपल्या अहंकारामुळे आपण यात अडकू शकतो हे आपल्याला समजले नाही ...तसेच अडकल्यावर देखील आपण अडकत चाललो आहोत ..अडकलो आहोत हे आपण हे आपण स्वतःशी मान्य करू शकलो नाही..कोणाची मदत घेण्यास तयार झालो नाही त्यामुळे अधिक अधिक अडकत गेलो ..विविध प्रकारचे नुकसान होत राहिले .. या आजारातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपण आता सर्व प्रथम स्वतच्या मर्जीने जिवन जगण्यास मिळावे हा अट्टाहास काही काळ बाजूला ठेवला पाहिजे . 

सर हे सर्व सांगत असताना आम्ही सगळे कान देवून ऐकत होतो ..सरांची व्यवस्थित उलगडून सांगण्याची शैली छानच होती ..पुढे त्यांनी सर्वाना एक प्रश्न विचारला ' जर समजा की तुम्हाला ' मिस्टर इंडिया ' या सिनेमा मध्ये अनिल कपूर सारखे अदृश्य होण्याचे ब्रेसलेट प्राप्त झाले ..तर सर्व प्रथम कोणकोणत्या गोष्टी आपण कराल ? ' प्रश्न जरा गमतीशीरच होता ..आठ दहा जणांनी उत्तरे देण्यासाठी हात वर केले ..शेरकर काकांचा हात देखील वर झाला ..एकेक जण उत्तरे देवू लागला ..सर मी कोणालाही नकळत राष्ट्रपती भवनात जावून फिरून येईल ..मी हॉटेलमध्ये जावून गुपचूप महागडे पदार्थ खावून येईल ..मी ' रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ' मध्ये जावून भरपूर नोटा घेवून येईन ..मी माझ्या शत्रूचा खून करीन ..मी सगळे जग विनातिकीट फिरून येईन ..मी ज्वेलरीच्या दुकानात जावून खूप दागिने आणीन माझ्या पत्नीसाठी ..अश्या प्रकारची उत्तरे सगळे देवू लागले ..शेरकर काका म्हणाले ' मी दारूच्या कारखान्यात जावून विदेशी मद्याच्या खूप बाटल्या आणीन ' सर्व मनापासून हसले ..जणू सर्वांच्या मानतील सामायिक इच्छाच शेरकर काकांनी बोलून दाखवली होती ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment