Saturday, May 31, 2014

बदनामीची भीती !

बदनामीची भीती ! ( बेवड्याची डायरी - भाग ५१ वा )


पाचव्या पायरीचे विवेचन करत असताना सरांनी सांगितले की एका व्यसनीला उगाचच असे वाटत असते की आपल्या व्यसनाबद्दल कोणाला काहीच माहित नाहीय .. तो कुटुंबीय आणि जवळचे लोक सोडून इतर लोकांसमोर प्रयत्न पूर्वक चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो ..मी किती चांगला व्यक्ती आहे ..मी किती हसतमुख ..खेळकर प्रवृत्तीचा आहे हे इतरांना भासवण्याचा त्याचा आटापिटा चाललेला असतो ..अशा वेळी त्याला आपल्या चुकांचा ..व्यसनांचा तसेच व्यसनासाठी केलेल्या भानगडींचा कबुली जवाब देणे अवघड वाटते ..' तो मी नव्हेच ' असा त्याचा अविर्भाव असतो ..खरे तर कुठून ना कुठून तरी आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या व्यसनी होण्याबद्दल माहिती कळलेली असते ..घरातील मोलकरीण ..सोसायटीचा वाॅचमन ...ऑफिसमधील सहकारी ..सोबत पिणारे मित्र ..अश्या लोकांकडून त्याच्या व्यसनी असण्याबद्दल व्यवस्थित माहिती पोचलेली असते सगळीकडे ..फक्त ' आपल्याला काय करायचेय ' या विचाराने लोक त्याच्या तोंडावर तशी चर्चा करत नाहीत ..किवा एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर व्यसनी त्याला अनेक समर्थने देवून उडवून लावतो ..अनेकदा कुटुंबीय देखील बदनामीच्या भीतीने तो व्यसनात अडकल्याची बाहेर कुठे वाच्यता करत नाहीत ..उलट कोणी तसा उल्लेख केला तर व्यसनीच्या चुकांवर पांघरून घालतात..असा हा आजार आहे ..त्यामुळे पाचव्या पायरीत सांगितलेले ' कन्फेशन ' करणे व्यसनी व्यक्तीला खूप जीवावर येते ' मुझको बरबादी का कोई गम नही..गम है बरबादी का क्यू चर्चा हुवा ' अश्या प्रवृत्तीने तो आपल्या चुका लपवून ठेवतो ..इतरांनी त्याच्याबद्दल चर्चा करू नये असे त्याला मनापासून वाटते ..कितीही झाकले तरी कोंबडे बांग देतेच हे विसरता कामा नये ..आपल्या चुकांवर पांघरूण घालून कुटुंबीय खरे तर आपल्या व्यसनीपणाला खतपाणी घालत असतात .
सर व्यसनी व्यक्तीच्या स्वभावाबद्दल तसेच त्याच्या कुटुंबियांच्या मनस्थिती बद्दल बारकाईने माहिती देत होते ..मला ते लागू पडते आहे हे जाणवले ..मी नेहमी बाहेरच्या लोकांमध्ये अगदी असेच वर्तन करत असे ..स्वतचा चांगुलपणा लोकांना जाणवावा असे वागत असे ..मी साधा भोळा..प्रामाणिक प्रवृत्तीचा ..जवाबदार ..सरळमार्गी व्यक्ती आहे असेच इतरांना भासवत असे ..खरेतर अनेकांना मी रोज दारू पितो ..दारूमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय ..माझ्या कुटुंबात भांडणे होत आहेत ..आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललो आहे ..कामावर दांड्या मारण्याचे प्रमाण वाढलेय .वगैरे माहिती मिळाली असणारच ..कारण मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की चार माणसे एकत्र जमली की ते इतरांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतातच ..तेथे हजर नसलेल्या व्यक्तीच्या दुर्गुणांची चर्चा करतात ..आपल्याला समजलेली गुप्त बातमी कोणाला सांगू नकोस असे म्हणत सगळीकडे वितरीत करतात .. फक्त त्या व्यक्तीच्या तोंडावर त्याला कोणी काही बोलत नाहीत कारण त्यांना तो आपलं अपमान करेल अशी भीती असते किवा ' ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल ' या उक्तीनुसार गप्प राहतात ..अलका भांडणात आमचा आवाज वाढला की शेजारचे लोक ऐकतील या भीतीने चूप बसत असे ..सुरवातीला तर तिने माहेरी देखील माझ्या पिण्याबद्दल वाच्यता केली नव्हती ..सगळे काही छान आहे असेच भासवले होते ..माझ्या आईबाबांनी देखील कधी इतर नातलगांकडे माझ्या पिण्याचा विषय काढला नव्हता ...इतरांना समजले तर बदनामी होईल या भीतीने त्यांनी माझ्या चुकांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न केला होता ..पाचव्या पायरीत स्पष्टपणे म्हंटले होते की आपल्या चुका मोकळेपणी कबूल केल्या पाहिजेत तरच पुढे जाता येते ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये केले जाणारे शेअरिंग हा पाचव्या पायरीचाच एक भाग आहे ...प्रत्येकाने निर्भयपणे शेअरिंग करणे गरजेचे असते ..
सरांचे बोलणे सुरु असताना एकाने हात वर करून विचारले ' सर हे जे ईश्वर ..स्वतः ..व आदरणीय व्यक्तीजवळ चुकांची तंतोतंत कबुली दिली असे म्हंटले आहे.. ते तीन भाग का केले आहेत ..? " सरांनी त्याचे उत्तर दिले ..म्हणाले खरेतर जेव्हा आपण ईश्वरी संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सर्वव्यापी ईश्वर ' यत्र ..तत्र ..सर्वत्र ' आहे असे म्हंटले होते ..म्हणजे प्रत्येक जीवात ते सर्वशक्तिमान चैतन्य वसलेले आहे ..तेव्हा चुकांची कबुली देताना नेमकी कोणाजवळ द्यावी हा प्रश्न पडतो ..किवा कोणाजवळही दिली तरी चालते का ? असा संभ्रम निर्माण होतो .. यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून हे तीन भाग आहेत ..पहिल्या भागातला ईश्वर म्हणजे आपले जवळचे कुटुंबीय ज्यात पत्नी ..आईवडील .भावंडे येतात ..आपण घरी अनेकप्रकारचे बेताल वर्तन केले आहे ..आपल्या वागण्याने कुटुंबियांना खूप त्रास झाला आहे ..आर्थिक ..मानसिक ..कौटुंबिक ..शारीरिक ..सामाजिक..आणि अध्यात्मिक या साऱ्या पातळ्यांवर जसे आपले नुकसान झालेय तसेच त्यांना देखील या सगळ्या पातळ्यांवर आपल्यामुळे त्रास झालेला आहे .. त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध केला ..प्रतिकार केला तेव्हा तेव्हा आपण आक्रस्ताळे पणाने ..आक्रमकपणे ..त्यांना चूप बसवले आहे ..किवा त्यांनी आपल्याबद्दल चर्चा सुरु करतच तेथून काढता पाय घेतला आहे..त्यांना आपल्यामुळे त्रास होतोय हे कधीच त्यांच्या समोर मान्य केलेले नाहीय ..तर त्यांच्यामुळेच आपल्याला त्रास होतोय असा कांगावा केला होता आपण ..पाचव्या पायरीचे आचरण करताना आपण जवळच्या नतलगांपुढे आपण त्यांना दिलेल्या त्रासाची कबुली देणे अपेक्षित आहे ..त्यामुळे त्यांना दिलासा मिळतो ..तसेच आपण मनापासून सुधारू इच्छितो हे त्यांना समजते ..त्यांचा आपल्यावरील गमावलेला विश्वास परत मिळण्यास सुरवात होते ..आपल्या वागण्याबद्दल आपल्याला खरोखर पश्चाताप होतोय याची खात्री वाटते ..आता दुसऱ्या भागात " स्वतः जवळ कबुली दिली " असा उल्लेख आहे ..म्हणजे केवळ नातलगांकडे कबुली देणे पुरेसे नाहीय तर ..आपल्याला स्वतःला ते आतून ..अंतर्मनातून पटले पाहिजे ..अगदी मनाच्या खोल गाभार्यातून आपण चुकलो आहोत हे वाटले पाहिजे ..केवळ पाचव्या पायरीत सांगितले आहे म्हणून नव्हे ..किवा आपण व्यसनमुक्ती केंद्रात आलोत म्हणून नव्हे ..अथवा आता आपल्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरला नाही म्हणून ..इतरांनी लवकर आपल्यावर विश्वास ठेवावा म्हणून ..आपल्याला माफ करावे म्हणून ..पश्चाताप झालाय असे दाखवावे म्हणून नव्हे तर .मनापासून आपण चुकलो आहोत याची खोल जाणीव व्हावी अशी अपेक्षा आहे ..
( बाकी पुढील भागात )

Monday, May 26, 2014

स्वभावदोषांचे उच्चाटन ..नव्या व्यक्तिमत्वाला आकार !

स्वभावदोषांचे उच्चाटन ..नव्या व्यक्तिमत्वाला आकार ! ( बेवड्याची डायरी - भाग ५० वा )
" आपल्या व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती तसेच ..सुखी , समाधानी , संतुलित आणि उपयुक्त जिवन व्यतीत करणे खूप कठीण आहे " असे सांगत सरांनी आज समूह उपचारात पुन्हा ' आत्मपरीक्षण ' या संकल्पनेवर जोर दिला .." हट्टी .जिद्दी ...आत्मकेंद्रित ..बेपर्वा ..टोकाच्या नकारात्मक भावना ..आळशीपणा ..चालढकल करण्याची वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे तत्वज्ञान ..बेजवाबदारपणा ..इतरांच्या भावनांची किंमत नसणे ..स्वताचेच खरे करून दाखवण्याचा अट्टाहास ..अश्या प्रकारच्या व्यसनी व्यक्तिमत्वाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची चर्चा सरांनी केली ..खरे तर नेहमी स्वतःच्या बचावासाठीच एक व्यसनी धडपडत असतो ..प्रत्येक वेळी तो चुका करतो आणि आपल्याला इतरांनी माफ करावे असा त्याचा आग्रह असतो ..त्याच वेळी तो इतरांच्या झालेल्या चुका मात्र लक्षात ठेवून असतो ..त्या चुकांचा वारंवार उल्लेख करून तो ..स्वतःवर किती अन्याय झाला आहे याचा पाढा मनात वाचत रहातो ..त्यातून आत्मकरुणेचा भाव निर्माण होऊन ..आपण किती गरीब आहोत ..बिच्चारे आहोत ..हे जग खूप स्वार्थी आहे ..आपल्यावर किती अन्याय झालाय ..याचा हिशोब मनात ठेवत मानसिक संतुलनासाठी आधार म्हणून दारू किवा इतर मादक द्रव्यांचे सेवन करत रहातो .. स्वतःला आपण जोवर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ..स्वतःचा शोध घेत नाही ..तटस्थपणे आपल्या चुकांचे परीक्षण करीत नाही ...तोवर आपल्या विनाशाला पूर्णपणे आपणच जवाबदार आहोत हे समजणार नाही ..शक्यता आहे की अनेक वेळा परिस्थिती ..आसपासची माणसे ..अघटीत घटना ..यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडत असेल ..परंतु अशा वेळी दारूचे सेवन करून परिस्थिती बदलत नाही ..अथवा समस्या सुटत नाही ..तर समस्या वाढते ...इतकी वाढत जाते ..की पुढे पुढे संघर्ष करण्याची क्षमता गमावून केवळ व्यसने करत राहणे हाच एक पर्याय आपल्यापुढे शिल्लक उरतो ..त्याऐवजी जर आपण जिवनावरील तसेच परमेश्वरावरील श्रद्धा जोपासली ..अखंड ठेवली तर नक्कीच आपल्या सकारात्मक क्षमता वापरून आपल्याला नव्याने उभे राहता येईल .."
" किती लोकांना आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले पाहिजेत हे मान्य आहे ? " सरांच्या या प्रश्नावर बहुतेकांनी हात वर केले आणि होकार दर्शवला ..एक जण तसाच मख्ख पणे बसून होता ..काय रे तुला सुधारावेसे वाटत नाही का ? असे सरांनी विचरताच तो म्हणाला ' सर माझ्या घरी माझे वडील देखील दारू पितात रोज संध्याकाळी ..त्यांना कोणी काही बोलत नाही मात्र मला येथे दाखल केलेय घरच्या मंडळीनी ..असे का ? " त्याच्या प्रश्नावर सर स्मित करत म्हणाले .. अगदी बरोबर प्रश्न पडलाय तुला..तुझ्या वडिलांनी देखील दारू सोडली पाहिजे असे तुला वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु इथे आपण स्वताच्या व्यसनमुक्तीसाठी दाखल झालो आहोत ..सध्या आपण फक्त स्वतःबाबत विचार करतो आहोत ..तू जर निश्चयाने प्रामाणिकपणे दारू सोडलीस तर नंतर तू वडिलांना देखील व्यसनमुक्तीसाठी मदत करू शकतो ..वडील पितात ..इतर नातलग पितात ..असे समर्थन करून आपण स्वतःचे व्यसन न्याय्य करू पाहतो आहोत ..एखादी चूक वडीलधारी माणसे करत असतील तर तीच चूक आपण केल्यास काही हरकत नाही हे तत्वज्ञान योग्य नाही ..तुझ्या वडिलांचे वय ..त्याच्या क्षमता ..त्याच्या जवाबदा-या ..यांची तुलना करता .कुटुंबीयांनी .. तू तरुण आहेस ..तुझे सगळे भविष्य घडायचे आहे ..तुला आधी उपचार दिले पाहिजेत असे ठरवले असले पाहिजे ..किवा वडिलांपेक्षा तुझ्या व्यसनमुक्तीला त्यांनी प्राधान्य दिले आहे.. हे खरेतर तुझ्या भल्या करिता आहे ..आता येथून सगळे चांगल्या प्रकारे आत्मसात करून तू बाहेर पडून व्यसनमुक्त राहिलास तर तुझ्या वडिलांना देखील उपरती होईल उपचार घेण्याची ..तू त्यांना मदत देखील करू शकशील व्यसनमुक्तीसाठी ..मात्र ते पितात म्हणून मी पितो हे समर्थन सर्वथा दुबळे आहे ..तू तुझ्या आईचा कधी विचार केला आहेस का ? नवरा आणि मुलगा दोघेही दारू पितात याचा आईला किती मानसिक त्रास होत असेल ? ती कशी सांभाळत असेल तुम्हा दोघांना ? तिची बिचारीची किती कोंडी होत असेल ? हा विचार कर आणि आधी स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी प्रामाणिक प्रयत्न कर " सरांनी सांगितलेले त्याला पटलेले दिसले ..त्याने होकारार्थी मान हलवली .
" आपल्या स्वभावातील दोष आपल्यासाठी हानिकारक आहेत हे मान्य केल्यानंतर ते आपल्या व्यक्तिमत्वाला पोखरून टाकून कुटुंबात ..समाजात आपल्याला बदनाम करत आहेत हे लक्षात घ्यायला हवे .हे स्वभावदोष काढून टाकून एका नव्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यास या पुढे आपण सज्ज झाले पाहिजे ..त्याची सुरवात पाचव्या पायरीपासून होईल असे म्हणत सरांनी पाचवी पायरी फळ्यावर लिहिली .." आम्ही ईश्वराजवळ ..स्वतःपाशी ..तसेच दुसऱ्या आदरणीय व्यक्तीपाशी आमच्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली दिली " सरांनी फळ्यावर लिहिलेली पायरी कोड्यात टाकणारी होती ..आपल्या चुकांची कबुली देण्याविषयी त्यात सुचवले होते ..मी जरा विचारात पडलो ..आजवर मी केलेल्या चुकांचे समर्थन केले होते ..आता त्याच सगळ्या चुका कोणाजवळ तरी कबूल करणे माझ्यासाठी कठीणच गोष्ट होती ..बहुतेक सरांनी आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचले असावेत ते हसून म्हणाले " घाबरू नका ..ही चुकांची कबुली देणे कठीणच आहे हे मी जाणतो .. एक मराठी म्हण आहे ' मान सांगावा जनात ..अपमान सांगावा मनात " त्या नुसार आपण नेहमी आपल्या बाबतीत आपले यश ..सन्मान ..कर्तुत्व ..याबाबत आसपासच्या सर्वाना कळावे म्हणून धडपडत असतो ..आणि बहुधा आपल्या चुका ..अपमानाचे प्रसंग ..आपल्यामुळे झालेले नुकसान.. अशा गोष्टी इतरांपासून लपवून ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतो ..त्यामुळे आपल्या चुकांची जाहीर कबुली देणे अवघडच आहे आपल्यासाठी ..या पाचव्या पायरीला ' कन्फेशन ' अथवा बदलाच्या सुरवातीची नांदी म्हणता येईल ..ख्रिस्चन धर्मात अशा ' कन्फेशन ' ला खूप महत्व आहे ..आपण सिनेमात अनेकदा असे दृश्य पाहतो की जेथे ..चर्च मधील शांत गंभीर वातावरणात ' कन्फेशन ' बॉक्स मध्ये चेहऱ्यावर अतिशय प्रेमळ आणि आश्वासक भाव असणारा फादर ..समोर असलेल्या व्यक्तीचे ' कन्फेशन ' ऐकतो ..आणि नंतर त्याला दोष न देता धीर देतो ..मार्गदर्शन करतो ...अशी कबुली देणे ही बदलाची उपरती मानली जाते ..आत्मशुद्धीची ही एक महत्वाची सुरवात आहे..सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ अशी चुकांची कबुली देण्याबाबत सर्व धर्मानी मान्यता दिलेली आहे..असे केल्याने आपल्या मनातील अपराधीपणाची बोच निघून जाण्यास मदत मिळते .
( बाकी पुढील भागात )

बिंग फुटले

बिंग फुटले ( बेवड्याची डायरी - भाग ४९ वा )
रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही साधारण पंचाविशीचे ..मी बिछान्यावर आल्यानंतर देखील बराच वेळ ते तिकडेच होते ..त्यांची काहीतरी खलबते चालली होती असा संशय आला मला ..सकाळी मी चहा घेताना सहज शेरकर काकांजवळ त्याचा उल्लेख केला ..शेरकर काकांचे डोळे चमकलेले दिसले ..म्हणाले ...बहुतेक त्यांचे इथून पळून जाण्याचे प्लान चालले असतील ..हे तिघेही श्रीमंत घरचे आणि खूप लाडावलेले आहेत ..आपण हे माॅनीटरला सांगितले पाहिजे ..मला शेरकर काकांना आपण हे उगाच सांगितले असे झाले ..कारण प्रकरण आता माॅनिटर पर्यंत गेले असते ..मला उगाचच कशात अडकण्याची इच्छा नव्हती ..मी तसे शेरकर काकांना बोलून दाखवले ..' अहो तुम्ही कशाला घाबरता ..तुम्हाला काही होणार नाही ..उलट एक सावध नागरिक म्हणून तुमचे कर्तव्यच आहे वार्डात काही चुकीचे घडत असेल तर माॅनीटरला सांगणे ' ..शेरकर काका डोळे मिचकावत म्हणाले ..नाश्ता झाल्यानंतर माॅनीटरने मला ते तिघे कोण कोण होते हे विचारले ..मी नावे सांगितली ..मला ते नक्की काय बोलत होते ते माहित नाही ..त्यांना मी नाव सांगितले हे कळले तर ते उगाचच मला त्रास देतील असे माॅनीटरला म्हणालो ..त्याने तुमचे नाव कोणाला समजणार नाही अशी खात्री दिली मला ..तुम्ही घाबरू नका असा धीर देखील दिला ..
दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता ..पुढे काय होणार उत्सुकता देखील होतीच मनात ..तसे येथून पळून जाणे अजिबात सोपे नव्हते ..कारण बाहेर जाण्याचा एकच दरवाजा होता ..तो दरवाजा ऑफिसात उघडत असे ..ऑफिसमध्ये नेहमी एकदोन तगडे कार्यकर्ते बसलेले असत ..बाकी वार्डात सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..म्हणजे पळून जायचे तर आधी ऑफिसमध्ये जायला लागले असते .. जेव्हा केव्हा महिन्याभराचे किराणा समान येई किवा आठवड्याचा भाजीपाला आणला जाई तेव्हा काही लोकांना ते सामान टेम्पो मधून उचलून आणण्यासाठी म्हणून बाहेर नेले जाई ..मात्र त्यावेळी तेथे एकदोन कार्यकर्ते हजर असत..हे लोक कसे काय पळून जातील याचा विचार करून डोके शिणले माझे ..संद्याकाळी समूह उपचारांच्या वेळी सरांनी त्या तिघांना उभे केले ..म्हणाले .." घाबरू नका सगळे खरे खरे सांगा ..रात्री काय खलबते सुरु होती तुमची ..तुम्ही तिघे काय करत होतात बाथरूमच्या भागात ? ..तुम्हाला काहीही शिक्षा होणार नाही " यावर नागपूरचा असलेला गौरव म्हणाला " सर मेको हग्गी लगी थी..इसलिये मै वहा गया था " त्याच्या या बोलण्यावर सगळे हसले ..हा गौरव खूप लहान वयात बिघडल्याने तसा चेहऱ्याने खूप भोळाभाबडा वाटे ..तो नेमका काय म्हणत आहे ते सरांना बहुतेक समजले नाही ..' हग्गी लगी थी मधील ' हग्गी ' शब्द मलाही नवा होता ..सरांनी पुन्हा त्याला विचारले ...नीट सांग मराठीत काय झाले होते तुला ? तर म्हणाला मला ' हागरी ' लागली होती ..पुन्हा सगळे हसू लागले ..मग समजले की त्याला ' हगवण ' लागली होती असे तो सांगत होता ..पुढे काय झाले ते सांग मला ..तू ' हग्गी लागली म्हणून तिथे गेला होतास .तर आत संडासात न जाता बाहेर काय बोलत बसला होतास या दोघांसोबत ? काय रे तुम्हाला दोघांना पण ' हग्गी ' लागली होती का ? सरांनी थोडे दरडावून विचारले ..गौरव तसा लेचापेचा निघाला ..तो पोपटा सारखा बोलू लागला ..म्हणाला मी तेथे गेलो तेव्हा हे दोघे पळून कसे जायचे याचा प्लान करत होते .मलाही यांनी थांबवले ..म्हणाले जेव्हा केव्हा आता भाजी आणायला बाहेर नेले जाईल तेव्हा आपण तिघेही जाऊ ..आणि बाहेरच्या अंगणात गेलो की संधी साधून पळून जाऊ ..' सरांनी त्यांना खाली बसायला सांगितले अन म्हणाले ' हे बघा इथून पळून जाण्याचे विचार मनात येणे साहजिक आहे ..कारण आपल्याला इथे असणारी शिस्तबद्धता आवडत नाही ..सकाळी लवकर उठण्यापासून सुरु होणारा इथला दिनक्रम पार पाडणे जीवावर येते बहुतेकांच्या ..परंतु मित्रांनो हे सगळे आपल्याच भल्यासाठी आहे हे विसरता कामा नये ..पळून गेलात तरी तुम्ही शेवटी घरीच जाणार ..घरचे लोक आम्हाला कळवतील तसे ..पुन्हा आमची गाडी येईल तुम्हाला न्यायला ..पूर्वी अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत ..शिवाय तुमच्या सोबत बाहेर लक्ष द्यायला उभे असणारे कार्यकर्ते इतके लेचेपेचे समजू नका ..ते देखील पूर्वी तुमच्यासारखेच होते ..ते अतिशय सावध असतात ..ते लगेचच पाठलाग करून पकडतील तुम्हाला ..तुम्ही ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राच्या कैदेत नसून व्यसनाधीनतेच्या कैदेत आहात ..तेव्हा ' मैत्री ' मधून कसे बाहेर पडता येईल याचा विचार न करता व्यसनांच्या गुलामीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार कराल तर अधिक फायदा होईल ..
" व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने आपले काहीच चुकत नाहीय असे प्रत्येक व्यसनीला वाटणे स्वाभाविक आहे ..तो सहजासहजी उपचारांना तयार होत नाही म्हणून अनेकदा त्याला खोटे बोलून किवा जबरदस्तीने उपचारांना आणावे लागते ..पालकांचा तो नाईलाज असतो ..परंतु इथे दाखल झाल्यावर जर तुम्ही मनापासून उपचारात सहभाग घेतलात तर आपले काय चुकले ते नक्की ध्यानात येईल तुमच्या ..तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या पालकांनी तुम्हाला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला ते उगाच नाही ..त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे म्हणूनच काही पैसे खर्च करून ते तुम्हाला उपचारांना आणतात ..इथेही जर तुम्ही पूर्वीसारखाच नकारात्मक विचार केलात तर ..पुढे खूप नुकसानाला सामोरे जावे लागेल ..आम्ही सगळे या यातना भोगल्या आहेत ..तुम्हाला त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून आमची तळमळ असते ." .सर अगदी तळमळीने समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटले ..शेवटी त्या तिघांनी सरांची माफी मागितली ..आमचे चुकले अशी कबुली दिली ..प्रकरणावर एकदाचा पडदा पडला ..
( बाकी पुढील भागात )

चिरफाड करणारे पत्र !

चिरफाड करणारे पत्र ! ( बेवड्याची डायरी - भाग ४८ वा )
माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते ..परंतु इथे केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एका विस्कळीत झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा आकार देण्याचे काम सुरु झाले होते ..शरीरातून दारू लवकर निघून जाते मात्र मनातून निघून जायला खूप वेळ लागतो ..कारण मनातील दारूच्या सेवनाशी निगडीत असलेल्या भावना इतक्या सहज सहजी निघून जात नाहीत ..त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आकलन ..परीक्षण ..करणे गरजेचे आहे ..ते झाले की मनाच्या साफसफाईचे काम सुरु होते .. नंतर केलेली स्वच्छता नियमित टिकवून ठेवणे आलेच ..नाहीतर दारू अथवा व्यसन हा अतिशय खुनशी शत्रू आहे ..तो आपल्या बेसावध होण्याची वाट पाहत रहातो ..पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतो ..मला हे पूर्णपणे पटले ..पूर्वी घरी देखील अनेकदा मी दारू सोडली होती ..एकदोन महिन्यातच माझा निश्चय डळमळीत होऊन पिणे पुन्हा पुन्हा सुरु झाले होते ..कायमची व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी स्वतःवर कष्ट घेण्याची गरज होतो मला ...
नाश्ता करून झाल्यावर मी वार्डात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माॅनिटरने मला एक पाकीट आणून दिले... पाकीट उघडेच होते ..म्हणाला विजयभाऊ जरा वाचा हे सगळे ..मी पाकीट घेवून त्यातील कागदाची घडी काढली ..उघडून पहिले तर वर प्रिय असे लिहिलेले होते ...एका कोपर्यात जावून बसलो वाचत ..
प्रिय ,
परवा मी भेटीला आले असताना तुम्ही घरी घेवून जाण्यासाठी जो हट्ट केला त्यामूळे मी खूप व्यथित झाले आहे ..शेवटी तर तुम्ही घटस्फोटाची धमकी दिलीत मला ..इतकी का मी वाईट आहे ? आपल्या नव-याने व्यसनमुक्त असावे ही अपेक्षा ठेवणे हीच माझी चूक आहे ना ? जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्ही व्यसनमुमुक्त राहू शकाल..तर मी खरोखरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईन ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे ..
मला माहित आहे की तुम्ही रोज पिवून घरी आलात की मी कटकट करते ..आदळआपट करते ..म्हणून तुम्हाला माझा राग येतो ..पण त्यामागे तुमचा जीव सुरक्षित व्हावा हीच भावना असते माझी ..वर्तमान पत्रातील व्यसनाशी संबंधित वाईट बातम्या वाचल्या की खरोखर माझ्या काळजाचा थरकाप होतो ..दारूच्या नशेत खून ..दारूच्या नशेत बलात्कार ..दारूच्या नशेत अपघात ..दारुड्या बापाचा मुलाने खून केला ..विषारी दारूने मृत्यू ..दारूमुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ..अश्या प्रकारच्या बातमीचा मथळा मला अवस्थ करतो ..तुमची काळजी वाटते सतत ..तुम्हाला खरे वाटणार नाही कदाचित पण तुमच्या आणि आपल्या संसाराच्या काळजीने अनेक रात्री मी जागी असते ..बाजूला तुम्ही नशेत चूर झोपलेले असताना मी जागीच आहे ..डोळ्याला डोळा नाही हे तुम्हाला कधी जाणवले नसेल ..माझे वागणे चुकत असेल तर तुम्ही मला तसे स्पष्ट सांगा ..मी तुम्हाला हवा तसा बदल करेन माझ्या वर्तनात ..तुम्ही कितीही भांडले माझ्याशी ..माझ्या माहेरच्या उद्धार केलात ..मला शिव्या दिल्यात ..मूर्ख ..बेअक्कल ..बावळट म्हंटले तरी चालेल ..मी सहन करीन सगळे ..मात्र तुमचे दारू पिणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतेय ..
माझ्या मनात आजकाल आत्महत्येचे विचार येतात हे मी तुम्हाला प्रथमच सांगते आहे ..पराभवाची भावना मला सतत घेरून असते ..माझ्या संसाराची किती किती स्वप्ने सजवली होती मी . गरिबीत ..दारिद्र्यात देखील आनंदाने संसार करायला तयार होते ..तुम्ही अर्धपोटी ठेवले असतेत तरी चालले असते मला ..आम्हा मुलींना लहानपणापासून हे तडजोड करायला ..संसार आहे तसा स्वीकारायला शिकवले जाते ..पण तुमच्या दारूबाबत मात्र मला तडजोड करता येत नाहीय ..हा माझा पराभवच आहे ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी उपास केले ..नवस केले ..रोज देवाजवळ तुम्ही आणि आपला संसार सुरक्षित राहावा म्हणून मी प्रार्थना करत असते ..तुमचा देव धर्मावर विश्वास नाहीय म्हणून तुम्हाला न सांगता माझे हे उद्योग सुरु असतात ..दारूच्या नशेत तुम्ही मला अनेकदा घर सोडून कायमची निघून जा ..तोंड काळे कर ..असे म्हणत असता तुम्ही नशेत असे बोलता म्हणून मी दुर्लक्ष करते त्याकडे ..परंतु परवा पहिल्यांदाच दारू न पिता तुम्ही घटस्फोट घेईन अशी धमकी दिलीत मला ..हे माझ्या मनाला फार लागून राहिले आहे ..
तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे ...तुम्ही बरे व्हावे म्हणूनच हे चालले आहे हे तुम्हाला समजत नाहीय का ? योग्य वेळी मी येथील सरांच्या सल्ल्याने तुम्हाला घरी घेवून येईन ..मी अगदी थोडी पितो ..असे तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आला आहात ..मात्र आता तुमचे पिणे हाताबाहेर गेलेय हे तुम्हाला वाटत नाही का ? असो ..हे पत्र वाचून तुम्हाला माझा राग येईल कदाचित ..मला क्षमा करा.
सदैव तुमची
अलका
पत्र वाचताना माझा हात थरथरत होता ..डोळ्यातून अश्रू ओघळले ..!
( बाकी पुढील भागात )

Sunday, May 18, 2014

बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय !


बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय ! ( बेवड्याची डायरी - भाग ४७ वा )


काल रात्रभर जवळ जवळ जागाच होतो ...चौथ्या पायरीत सांगितल्या प्रमाणे ..स्वता:च्या चुकांचे समर्थन करणारा वकील बाजूला काढून आत्मपरीक्षण करताना माझी अवस्था खरोखर कठीण झाली होती ...आठवते तेव्हापासून स्वतच्या शोध घ्यायला सुरवात केल्यावर अनेक बारीक सारीक प्रसंग आठवू लागले ..जेथे मी माझी चूक मान्य करण्याऐवजी इतरांना दोष तिला होता ..कांगावा केला होता ...माझी चूक कबूल न करता इतरांशी भांडण करत गेलो होतो ...डायरीत प्रश्नाचे उत्तर काय लिहावे ते नेमके न समजल्याने मी माँनीटरला जेव्हा त्या बद्दल विचारले होते तेव्हा तो म्हणाला ..' आत्मपरीक्षण ' ही एका तासात होण्यासारखी प्रक्रिया नाहीय ..सध्या तुम्ही फक्त एक काम करा ..काम ..क्रोध ..लोभ ..मद..मोह आणि मत्सर या विकारांचा डायरीत एक एक भाग करा ..आणि आठवेल तेव्हा पासून या विकारांच्या बाबतीत तुमचे वर्तन कसे होते ते प्रत्येक विकाराच्या बाबतीत लिहून काढा ..तसेच त्या वर्तनामागील तुमचे नेमके विचार अथवा भावना यांचे परीक्षण करा ..त्या त्या वेळी ते विचार योग्य होते का ? त्या भावना नैतिक होत्या का ? हे तपासा ..अर्थात तुम्हाला हे सगळे करत असताना आत्मग्लानी येणे किवा अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणे ..हे परिणाम मिळतील तात्पुरते ..मात्र त्या मुळे खचून न जाता ..नेटाने प्रयत्न सुरु ठेवा ..पुढे ही अपराधीपणाची भावना काढून टाकण्यास देखील मदत मिळेलच नक्की ..

रात्री सगळे आठवत बसलो तसा अधिक अधिक खिन्नता येत गेली ..वाटले जर बारकाईने विचार केला तर आपण दिसतो तितके ..भासवतो तितके ..साधे सरळ नाही आहोत ..आपल्या मनात सतत एक स्वार्थ दडलेला असतो ..हा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपण वेळोवेळी खोटे बोलतो ..वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतो .. स्वार्थ कधी खाण्यापिण्याच्या वस्तूंचा ..कधी लैंगिक सुख मिळवण्याचा ..कधी आयता पैसा कसा मिळेल ..आपल्या मान सन्मान कसा प्राप्त होईल ..याबाबतचा असतोच ...शिवाय मत्सर देखील असतो आपल्या मनात अनेक लोकांबद्दल ..किवा सुप्त असूया असते ..त्यांचे रंगरूप ..वैभव ..संपत्ती त्यांचा मान सन्मान याबद्दल ..माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर अनेक दिवस मला उगाचच त्या कधीच न पाहिलेल्या श्रीराम नेने बद्दल असूया वाटत होती ...जेव्हा कोणी माझ्या मनाविरुद्ध वर्तन करे तेव्हा मला त्याचा प्रचंड राग येवून अनेकदा ती व्यक्ती मरून जावी..उध्वस्त व्हावी ..असा मी विचार केला आहे ..माझ्या दृष्टीने नालायक असणाऱ्या अनेक लोकांना कसे संपवता येईल याचे मनसुबे रचले आहेत मनात ..अर्थात ते अमलात आणले नाहीत ही गोष्ट वेगळी .. कौटुंबिक ..सामाजिक ..अथवा देशांतर्गत कायदे पालन करण्याऐवजी ते कसे मोडता येतील याचा विचार अनेकदा मनात येतो ..लाल सिग्नल असताना मी अनेकदा आसपास कोणी पोलीस नाहीय हे पाहून सिग्नल तोडला आहे ..अशावेळी माझ्याकडे इतर वाहन चालक जेव्हा आश्चर्याने पहात तेव्हा मला खूप अभिमान वाटे ..माझे गाडी चालवण्याचे लायसन जवळ नसताना देखील मी अनेकदा गाडी चालवली आहे ..' दारू पिवून गाडी चालवणे हे तर नेहमीचेच असते .." पाहून घेवू काय होईल ते " या बेदरकर वृत्तीने ..एकदा मी जेमतेम १७ वर्षांचा असताना खोटे वय सांगून ' फक्त प्रौढांसाठी ' असलेल्या सिनेमाला मित्रांसोबत गेलो होतो ..त्या सिनेमात जंगलात ..गुहेत राहणाऱ्या आदिमानवा बद्दलचे चित्रण होते ..त्या सिनेमातील आदिमानवांना आजच्या सुधारलेल्या मानवा सारखी नैतिकतेची वगैरे बंधने अजिबात नव्हती ...ज्याच्याकडे जास्त शक्ती आहे युक्ती आहे तो सरळ सरळ इतरांवर अन्याय करून आपले सुख ओरबाडून मिळवीत होता ..विवाहबंधन पण नव्हते ..पसंत पडेल त्या वेगवेगळ्या स्त्रियांशी संग करण्यास मुभा होती ..लैंगिक संबंधातून निर्माण होणारी मुले ही आपोआप सगळ्या समूहात मोठी होत असत ..त्यांची जवाबदारी वडिलांवर नसे . नंतर आम्हा मित्रांना अनेक दिवस आपण त्या आदिमानवाच्या काळात जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते असे वाटत राहिले होते ..

रात्रभर सगळे असेच विचार मनात थैमान घालत होते ..मी आतून हादरलो होतो ..एरवी आपण मोठ्या समाजसेवेच्या ..न्यायाच्या ..प्रामाणिकपणाच्या ..कर्तव्यपालनाच्या ..गप्पा मारतो .मात्र स्वताच्या आत दडलेली नैतिकता तपासताना खरोखर आपण कोण आहोत ..कसे आहोत याची स्पष्ट जाणीव होते ...रात्रभर सारखी कुशी बदलत जागा होतो ..सकाळी मला पी .टी. करायचा देखील कंटाळा आला होता ..माॅनीटरला सकाळी माझी तब्येत बरी नाही असे सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले ..त्याने माझ्या कपाळाला हात लावून ताप आहे का ते पहिले ..मग म्हणाला ..ताप तर नाहीय तुम्हाला ..बहुतेक तुम्ही सिरीयसली आत्मपरीक्षण केल्याने असे कंटाळवाणे वाटत असेल ..रात्री झोप लागली नसेल ..असेच होते आत्मपरीक्षण करताना ..ते संत कबीराच्या दोह्या सारखे ' बुरा जो देखन मै चला ..बुरा ना मिलेया कोय '..खुद के अंदर झांक के देखा मुझसे बुरा ना कोय " ही भावना निर्माण होते ..कबीरा सारख्या संताला देखील असे वाटले तर आपली सर्वसामान्यांची काय कथा ..अर्थात तुम्ही प्रामाणिकपणे स्वताच्या आत शोधले म्हणून तुम्हाला तसे वाटतेय ..काही जण इतक्या प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत नाहीत त्यांना आपली चूक समजतच नाही ..अश्या लोकांना वारंवार उपचारांना यावे लागते ..

( बाकी पुढील भागात )

Wednesday, May 14, 2014

आत्मप्रौढी ..अहंकार ..आत्मक्लेश ..आत्मग्लानी वगैरे !

आत्मप्रौढी ..अहंकार ..आत्मक्लेश ..आत्मग्लानी वगैरे ! ( बेवड्याची डायरी - भाग ४६ वा )

सरांनी स्वतःमधील स्वभावदोष शोधून लिहिण्याबाद्दलच्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो तेव्हा ..सुरवातीला काय लिहावे तेच कळेना ..एक व्यसन करणे सोडले तर माझ्या स्वभावात फारसे काही दोष नव्हतेच ..उलट लहानपणापासून मी घरात आणि बाहेरही अतिशय गुणी मुलगा म्हणून वावरत होतो ..अभ्यासात ..खेळात ..बऱ्यापैकी प्राविण्य होते ...मित्र मंडळी व नातलगांमध्ये प्रसिद्ध होतो चांगलाच ...घरातही लाडका होतो सर्वांचा ..योग्य वेळी पदवीधर होऊन चांगली सरकारी नोकरी पण लागली होती मला ..स्वतःचा फ्लँट घेतल्यावर ..एक चांगले स्थळ म्हणून मला लग्नाच्या बाजारात मागणी होती ..मनासारखी पत्नी मिळेपर्यंत मी अनेक मुलीना नापसंत केले होते .. एकंदरीत सगळे छानच होते .. गडबड कुठून सुरु झाली असावी ते आठवेना ..आताशा गेल्या चारपाच वर्षात माझे दारू पिणे नियमित झाले होते ..तसेच कोटा देखील वाढला होता ..त्यामुळे अलकाची कटकट सुरु झाली की शब्दाने शब्द वाढून आमची भांडणे होत असत ..त्याला अलकाच जवाबदार होती असे माझे मत होते ..आपलं नवरा घरादारासाठी झटतो ..कष्ट करतो ..दिवसभर ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना ..तणावांना सामोरे जावे लागते त्याला ..तेव्हा रात्री थकून भागून घरी आल्यावर ..प्रेमाने विचारपूस करण्याऐवजी ..एकमेव विषय माझ्या दारू पिण्याचा ..हा विषय अजिबात काढायचा नाही असे अनेकदा बजावून सांगितले होते तिला ..तरीही ती माझ्या पिण्याचा विषय काढून भांडण ओढवून घेत असे ..मग मी चिडणे स्वाभाविक असे ..आणि रागाच्या भरात काही तोंडातून निघून गेले तर ..तिचा कांगावा ..रडणे .सुरु होई ..मुलेही घाबरून जात आमच्या भांडणाने ..मी तिला नेहमी सांगे ..तुला घरात काही कमी आहे का ? भौतिक सुखाच्या सगळ्या वस्तू आहेत ..त्यांचा छान उपभोग घेत आनंदाने राहायचे ..पण नाही ..एखाद्याचा स्वभावच कटकट्या असतो म्हणतात ना ..कोणताही विषय येवून जावून माझ्या दारूवर येई शेवटी ..अलीकडे तर..अलकाचे वागणे पाहून हिला एखद्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे कि काय असे मला वाटू लागले होते ..आझे आईवडील ..भावंडे यांचेही तसेच ..ते देखील जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा तेव्हा माझ्या तब्येतीबद्दल ..विशेषतः दारूबद्दल लेक्चर देत असत ..त्यांच्या अशा वागण्यामुळे मी त्यानाही हल्ली टाळत असे शक्यतो ..जगात बोलायला इतके विषय असताना यांना मात्र नेमके माझ्या दारूबर बोलायला का आवडते हा प्रश्नच होता मोठा ..मी दारू पिऊन कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..कधी कोणाकडे भिका मागितल्या नव्हत्या ..अथवा कधी दारूच्या नशेत रस्त्यावर ते झोपडपट्टीतले लोक करतात तसा तमाशा केला नव्हता ...तेव्हढे भान मला नेहमीच असे ..
लिहिता लिहिता मी एकदम थांबलो ..अरे ..आपल्या स्वताचे आत्मपरीक्षण करायचे होते ..इथे तर आपण अलकाचे परीक्षण लिहितोय ..शिवाय माझ्या वर्तनातील चुकीच्या बाजू न लिहिता ..माझ्याकडे चांगले काय काय आहे हे लिहित बसलो होतो ..ही तर आत्मप्रौढी झाली ..सरांनी सांगितले होतेच आपले दोष शोधणे अतिशय कठीण असते .." इतरांच्या डोळ्यातील कुसळ दिसते मात्र स्वताच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही " तसे..छे !..आपण समर्थनाचा वकील बाजूला न काढताच हे आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करून अलकाला दोष देत होतो ..आत्मपरीक्षण हे तटस्थपणे ..पारदर्शकतेने व्हायला हवे ..अगदी आठवते तेव्हापासून आपली नैतिकता शोधली पाहिजे ..मला काही सुचेनासे झाले ..नुसताच पेन हातात धरून बसलो ..मग आठवले ..लहानपणी एकदा मी रागाच्या भरात जेवणाचे ताट लाथाडले होते ..माझ्या आवडीची भाजी केली नव्हती म्हणून जेवण करणार नाही म्हणून हटून बसलो होतो ..बाबा रागावले मला त्यांनी अन्न हे पूर्णब्रम्ह असते त्याचा अपमान करू नये म्हंटले तेव्हा मी रागाने पानावरुन उठलो होतो ..उठताना चुकून झाले असे दर्शवत मुद्दाम पानाला लाथ मारली होती ..त्यावर बाबांनी एक झापड मारताच ..चुकून झाले तरी मला मारले म्हणून रडून खूप गोंधळ घातला होता ..कॉलेजला असताना ज्युनियर्सचे रँगिंग घेण्यात माझा पुढाकार असे ..एकदा एकाला आम्ही बळजबरी सिगरेट प्यायला पावली होती ..तो जेव्हा झुरका मारून ठसकत होता तेव्हा आम्ही खूप हसत होतो ..त्याची मजा घेत होतो ..तो मात्र डोळ्यात पाणी आणून विनवणी करत होता ..मित्रांमध्ये खर्चायला पैसे हवेत म्हणून मी अनेकदा बाबांच्या नकळत त्यांच्या पाकिटातले पैसे काढले होते ..चक्क चोरी केली होती ..लग्नानंतर देखील एकदोन वेळा अलकाच्या पर्स मधून मीच तिला घरखर्चासाठी दिलेले पैसे तिच्या नकळत काढले होते ..वर तिने विचारल्यावर हात वर केले होते ..तू वेंधळी आहेस ..हरवले असतील कुठेतरी म्हणून तिलाच दोष दिला होता ..अलीकडे माझ्या पगाराचा हिशोब तिला देणे बंद केले होते ..झालेली पगारवाढ तिच्यापासून लपवली होती ..अनेकदा आईची ..बाबांची ..अलकाची ..मुलांची खोटी शपथ घेतली होती उद्यापासून दारू नक्की सोडतो म्हणून ...अलकाला भांडणात अनेकदा तू घर सोडून जा आत्ताच्या आत्ता हे बजावले होते ..जणू ती माझी आश्रित असल्यासारखे वागवले होते तिला ..कामावरच्या पैश्यात अनेकदा थोडी गडबड करून चक्क पैसे खाल्ले होते ..म्हणजे खोटे हिशोब दाखवले होते ..हे सगळे नक्कीच नैतिकतेत बसणारे नव्हते ...
पुढे अनेक गोष्टी आठवू लागल्या मला ...एकदम भरून आल्यासारखे झाले ..बापरे .हे कधी शोधलेच नव्हते आपण ..अजून कितीतरी गोष्टी आहेत ..जेथे मी नैतिकतेची पर्वा न करता ..इतरांच्या भावना विचारात न घेता हवे तसे वर्तन केले होते ..वाट्टेल तशी दुरुत्तरे केली होती ..स्वताची चूक असूनही इतरांना दोष तिला होता ..माझे उच्च शिक्षण ...माझी नोकरी ..माझी कमाई ..माझा तडफदारपणा ..माझी हुशारी ..या बद्दल स्वतःवरच खुश राहून माझ्या वर्तनाचे समर्थन करत गेलो होतो ....मला खूप अपराधी वाटू लागले सगळे आठवल्यावर ..आपण खरोखरच खूप वाईट वागलो आहोत असे वाटले ..आईबाबांनी आपल्या जन्मानंतर किती स्वप्ने पहिली असतील आपल्यासाठी ..मात्र दारू प्यायल्यावर मी सरळ सरळ त्यांचा अपमान करत असे ..त्यांचे माझ्यावरील प्रेम ..माया याची पर्वा केली नाही ..,लग्नानंतर नवीन संसाराची स्वप्ने पाहिलेल्या अलकाला जेव्हा मी घरातून निघून जा ..असे मी म्हंटल्यावर किती क्लेश झाले असतील ? ..भावाने माझ्या दारू पिण्याबद्दल मला समजावले तेव्हा ..हा माझा पर्सनल मामला आहे ..त्यात तू दखल देवू नकोस असे सांगितल्यावर त्याला काय वाटले असेल ? एकदा सासरेबुवा घरी आले असताना मी अलकाशी भांडण करून तिचा अपमान केला असताना सासरेबुवा मध्ये बोलले तेव्हा त्यांना देखील ..नवराबायकोच्या भांडणात तुम्ही मध्ये बोलू नका ..तुमची मुलगी इतकी लाडकी असेल तर घेवून जा तिला असे बजावले होते ..मी एकदमच खिन्न झालो सगळे आठवून ..आता हे सगळे कसे लिहायचे ? असा प्रश्न पडला ..अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली ....शेवटी मी वही बंद केली ..उद्या लिहू असे म्हणत !
( बाकी पुढील भागात )

कर्णपिशाच्च !


कर्णपिशाच्च ! ( बेवड्याची डायरी - भाग ४५ वा )

आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..

इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लाघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लाघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..

मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा म्हणे वाहिनी भेटीला आल्या होत्या ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .

( बाकी पुढील भागात )