Friday, May 3, 2013

मान्यता..प्रार्थना !



मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ' ड्रिंक ' असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ' कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो . नंतर एकाने समोरच्या भिंतीवर असेल्या बोर्डवर लिहिलेली प्रार्थना वाचली सगळ्यांनी त्याच्या मागे ती प्रार्थना म्हंटली आणि सुप्रभात चा नारा दिला गेला व चहा वाटप सुरु झाले स्टुल वर किटली ठेवून त्या मोठ्या किटलीतून प्रत्येकाच्या ग्लासात चहा ओतण्याचे काम ऐक जण करत होता ..सगळे शिस्तीत रांगेने येऊन चहा घेत होते .. चहा घेण्यासाठी सर्वाना रांगेत उभे राहिलेले पाहून जरा गम्मत वाटली ..मला असल्या रांगेची वगैरे सवयच नव्हती कधी ..अगदी गँस सिलिंडर आणण्यासाठी देखील गेलो असता रांग पाहून माझे डोके फिरत असे ..सकाळपासून चहा हवासा वाटत होता म्हणून नाईलाजाने रांगेत उभा राहिलो तर मॉनीटर जवळ येऊन म्हणाला तीन दिवस तुम्हाला रांगेत उभे न राहण्याची सवलत मिळू शकते कारण नवीन आलेल्या लोकांना व्यसन न केल्यामुळे शारीरिक त्रास होत असतात तसेच मानसिक अवस्थता असते ..मला अशक्तपणा वाटत होताच थोडासा पण अशी सवलत घेणेही आवडले नाही म्हणून त्याने दिलेल्या ग्लासात रांगेने चहा घेतला . चहा घेताना शेजारी बसलेल्या एकाला विचारले की मघा तुम्ही सगळे " मी ' ड्रिंक ' घेतो असे म्हंटल्यावर का हसलात ? " तर तो पुन्हा हसला ... म्हणाला ' अहो , बहुतेक सगळेच असे दारू म्हणण्या ऐवजी ' ड्रिंक ' म्हणतात ..कारण दारू म्हंटले की जरा लेव्हल खाली आल्यासारखे वाटते माणसाला व ' ड्रिंक ' म्हणणे मोठेपणा वाटतो शिवाय ड्रिंक असे म्हंटले की आपण दारूमुळे होणारे दुष्परिणाम नाकारून मनातल्या मनात दारूचे उदात्तीकरण केल्यासारखे होते.. खरे तर वर्ष सहा महिन्यातून आणि अगदी एखादा पेग घेतला जातो तेव्हा ड्रिंक असे म्हणण्याची प्रथा आहे भारतात ..आपण सगळे रोजच दारू पीत होतो ..स्वतःला आणि कुटुंबियांना त्रासही होत होता आपल्या पिण्याचा तरी आपण सरळ दारू न म्हणता ड्रिंक म्हणतो याची गम्मत वाटते इथे . त्याचे म्हणणे मला पटले आणि स्वतची गम्मत देखील वाटली . चहा घेऊन नंतर अंघोळीला गेलो ..घरी मी आंघोळीला जाताना अलका ला आवाज दिला की ती टॉवेळ .कपडे ,,गरम पाणी असा सगळा सरंजाम बाथरूम मध्ये तयार ठेवत असे इथे मात्र स्वतःलाच सगळे करावे लागणार हे लक्षात आल्यावर आपण पत्नीवर किती अवलंबून आहोत हे जाणवले मात्र तरीही तिच्या म्हणण्यानुसार दारू सोडू शकलो नाही याचा खेद वाटला .

बाथरूम समोर नंबर लावून अंघोळ उरकली अंघोळ करून छान फ्रेश वाटले ...तो पर्यंत नाश्त्याची वेळ झालेली होती ..मला लॉकर देताना मॉनीटर ने ऐक कप्पे असलेली स्टीलची थाळी आणि ऐक चमचा देखील दिला होता व ती थाळी प्रत्येकवेळी नीट धुवून ठेवायची असेही बजावले होते ..ती थाळी न चमचा घेऊन पुन्हा नाश्त्याच्या रांगेत उभा राहिलो ..पोहे होते नाश्त्यासाठी ..गरम गरम पोहे खाताना घरी कधी अलकाने नाश्ता करणार का असे विचारल्यावर तिच्यावर मी चिडत होतो हे आठवले . नाश्ता झाल्यावर परत एकदा चहा दिला गेला ..आणि मग ' समूह उपचार ' म्हणजे ' ग्रुप थेरेपी ' ' होणार असे समजले . मला तीन दिवस आराम करण्याची मुभा होती तरी मी सगळ्यांबरोबर समूहात बसलो . ऐक नवीन माणूस ' समूह उपचार घेण्यासाठी उभा होता इथे काही कार्यकर्ते निवासी आहेत तर काही बाहेरून येणारे आहेत असे समजले होते मला .सर्वाना सर् असे संबोधण्याची पद्धत होती व सगळे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे व्यसनी होते.. आता तेच व्यसनमुक्ती च्या कार्यात सहभागी आहेत ही माहिती समजल्यावर त्यांचे कौतुकही वाटले.. मला ही सगळी माहिती ते शेरकर काका पुरवीत होते .
समूह उपचाराच्या सुरवातीला प्रार्थना म्हंटली गेली .

' जे टाळणे अशक्य , दे शक्ती त सहाया , 
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया , 
मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय ,
माझे मला कळाया , दे बुद्धी देवराया ! 

अशी होती सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले " मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत " सरांचे वकृत्व छान वाटले ... ते हिंदीत बोलत होते त्यामूळे उपचारांसाठी दाखल असलेल्या , मध्यप्रदेश , छत्तीसगढ , उत्तर प्रदेश येथील बांधवाना आणि इतरभाषीय लोकांना देखील समजणे सोपे होते . सरांनी सर्वाना ऐक प्रश्न विचारला सांगा पाहू जगात काय काय टाळणे आपणास अशक्य आहे ? सगळे जण विचारात पडले मग एकाने उत्तर दिले ' मौत ' , दुसरा उद्गारला ' जन्म ' पुन्हा सगळे शांत होते सर् आम्हाला विचार करायला प्रवृत्त करत होते मग एकाने उत्तर दिले ' दुखः ' ... अपघात , ' ..अगदी बरोबर सर् म्हणाले पुढे सर् बोलू लागले ' एका माणसाला नेहमी आपण आनंदी असावे असे वाटते व ही मानवी प्रवृत्तीच आहे पण ..जगात प्रत्येकाच्या मनासारखे सगळे घडत नाही कारण आपण ज्या निसर्गात राहतो त्याचे काही नियम आहेत ...निसर्गनियमानुसार आपल्या जिवनात कधी सुख येते तर कधी दुखः येते ..कधी एखाद्या जिवलग माणसाचा मृत्यू होतो ..तर कधी कोणाचा जन्म होतो ..दिवस उगवतो .मावळतो आणि रात्र होते ..भरती येते .पुन्हा ओहोटी असते , काळीकुट्ट अमावस्या येते तशीच अल्हाददायक पौर्णिमा देखील असते . ओघवत्या भाषेत सर् बोलत होते आणि सगळे मन लावून ऐकत होते . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment