Friday, May 3, 2013

प्राणायाम


ऑफिस मधून नाईलाजाने वार्डात परतलो , मात्र मान खूप बैचेन झाले होते , कुठून आपल्याला इथे येण्याची दुर्बुद्धी सुचली असे झाले होते ..अलकाचा रागही येऊ लागला होता मला ..जगात कितीतरी लोक दारू पितात ..मी प्यायलो तर काय बिघडले होते तिचे ? .. बर किमान सकाळपासून मला इथे सोडून गेलीय ..निदान एखादा फोन तरी करायला हवा होता तिने मला .. हळू हळू माझी बैचेनी वाढत होती सारखा बाहेरच्या दाराकडे लक्ष होते माझे ...टर्रर्र्र्र्र्र अश्या कर्कश्य आवाजात ऐक बेल वाजली तसे सगळे जण हॉल मध्ये सतरंजीवर जाऊन बसले , एकाला विचारले काय आहे हा प्रकार तर म्हणाला ' प्राणायाम ' ची वेळ झालीय आता , ऐक तास प्राणायाम करायचा आहे सगळ्यांना .बापरे ..प्राणायाम वगैरे प्रकार मी फक्त ऐकून होतो ..कधी कधी अलका रामदेव बाबांचे प्राणायाम टी.व्ही वर पाहत असे हे माहित होते ..पण आपल्याला हे करावे लागणार या विचाराने माझी अवस्थता अजून वाढली . पुन्हा तो मघाचा चुणचुणीत तरुण माझ्या जवळ येऊन म्हणाला ..' तुम्हाला तीन दिवस आराम करायचा आहे , मग बरे वाटले की प्राणायाम करावा लागेल ' . .मी मनात म्हणालो ' बेट्या राहणारच नाहीय मी तुमच्याकडे तीन दिवस ..आता उद्या अलका भेटायला आली की जातो मी घरी " . माझ्या शेजारी अजून ऐक जण गादीवर झोपला होता ..त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो प्राणायाम करत नव्हता ..त्याला विचारले की तो इथे किती दिवसापासून आहे तर म्हणाला ' उद्या ऐक महिना पूर्ण होईल मला ' . इतके दिवस हा इथे कसा राहू शकला याचे कुतूहल वाटले तर म्हणाला ' पहेले पहेले जरा बहोत गुस्सा आता है सबको , लेकिन बादमे सब ठीक हो जाता है ' मी मनातून जरा हादरलो होतो ..पण मला खात्री होती की अलका उद्या मला भेटायला येईल तेव्हा नक्की माझी सुटी होईल .आणि सरांनीही मला तसेच सांगितले होते ..हे मी त्याला सांगितले त्यावर तो मोठ्याने हसला ..माझ्या अज्ञानाची त्याला गम्मत वाटली असावी म्हणाला ' ऐसे सबको बोलते है सर् , लेकिन ऐक बार अंदर एन्ट्री होने कें बाद ऐक महिना रहेनाही पडता है सबको ' त्याचे हे उद्गार माझ्या जखमेवर मीठ चोळणारे होते ..मी नुसताच बावचळून त्याच्याकडे पाहत राहिलो . बाहेर हॉल मधून सर्वांचा ' श्वास जोरात बाहेर सोडल्याचा आवाज येत होता .. तो म्हणाला ' कपालभाती ' कर रहे है सब लोग ' . मी पुन्हा उठून बाहेर दाराकडे जायला निघालो तर तो तरुण मला अडवण्यासाठीच बाहेर थांबला होता जणू ..लगेच त्याने मला अडवले व म्हणाला ' सर् आता कामात आहेत , तुम्हाला बाहेर जाता येणार नाही .त्याने जरा ताकदिनेच माझा दंड पकडला होता ते जाणवले ,गुपचूप परत फिरलो न पलंगावर येऊन बसलो .

खिडकीतून बाहेर पहिले ..अंधार दाटून येत होता .. आता माझे सगळे मित्र जमले असतील बार मध्ये ..मस्त सगळे मजा करत असतील आणि मी ..इथे जेल मध्येच अडकलो होतो ..छे ! काहीतरी केले पाहिजे इथून बाहेर पाडण्यासाठी ..ऐक महिना मला राहणे शक्यच नव्हते ..एकतर माझी तेव्हढी रजा शिल्लक नव्हती ..कितीतरी कामे बाकी होती ..विम्याचा हप्ता ..विजेचे बिल .. .वर मी मित्रांकडून उधार पैसे घेतले होते ते देखील परत करायचे होते ..मी पुन्हा उठू लागलो तसे बाजूच्या माणूस म्हणाला ' यार ,बार बार बाहर मत जाओ आप , फालतू में कोई आपको डाटेंगा ' पुन्हा बसलो नुसती चीड चीड होत होती माझी ..थोड्या वेळाने तो तरुण बहुधा वार्ड चा प्रमुख असावा तो हातात चार गोळ्या आणि एका ग्लासात काहीतरी घेऊन आला ..' हे घ्या औषध ..हे घेतले की बरे वाटेल तुम्हाला ' मी त्याला म्हणालो 'आधी मला सरांना भेटू द्या ,मग घेईन औषध ' ' अहो सर् आताच बाहेर गेलेत , ते आले की नक्की भेट घ्या तुम्ही ' तो बोलण्यात हुशार होता खूप ...पुढे म्हणाला ' विजयभाऊ , अहो हे औषध घेतले तर तुमची बैचेनी कमी होईल न भूक ही लागेल , सकाळी तुम्ही जेवला देखील नव्हता ' त्याचा सहानुभूतीचा स्वर ऐकून जरा बरा वाटले त्याने दिलेल्या गोळ्या हातात घेऊन तोंडात टाकल्या आणि त्याच्या हातातील ग्लास घेतला तर हात पुन्हा थरथर कापू लागला तो थरथरत्या हात कडे पाहतोय हे लक्षात येताच मी जरा शरमलो . ग्लास तोंडाला लावला .. ते पाणी गोड लागले ' ग्लुकोज ' घातले आहे त्यात ' ..त्याने माहिती पुरवली .

औषध घेऊन पुन्हा पलंगावर आडवा झालो आणि डोळे मिटले ..असं कसा मी मुर्ख असे विचार मनात येऊ लागले ..कुठून हिच्या नादी लागलो ..अन इथे आलो . ..माझे दारू पिण्याचे प्रमाण आता वाढले होते हे मलाही जाणवत होते पूर्वी आठवड्यातून एकदा शनिवारी घेणारा मी आता रोजच घेत होतो ..अन सुटी असली तर मग दुपारी देखील हुक्की येई ... . पण म्हणून काही अगदी व्यसनमुक्ती केंद्रात येण्याइतका पीत नव्हतो मी ..आणि मी जर ठरवले असते तर येथे न येताच सोडू शकलो असतो की ...पूर्वी दोन तीन वेळा मी अनेक दिवस पिणे बंद केले होतेच ! पुन्हा एकाने हाक मारली म्हणून डोळे उघडले तर ऐक दुसराच माणूस मला हाक मारत होता ..त्याच्या हातात अन्नाचे ताट होते ' जेवून घ्या थोडेसे ' तो आपुलकीने म्हणाला तसा उठून असलो फारशी भूक नव्हतीच मला पण सकाळपासून काही खाल्ले नव्हते म्हणून जेवू लागलो थोडासा वरणभात खाल्ला ...पोळी भाजीला हात लावला नाही .. त्या माणसाने आग्रह केला म्हणून ऐक पोळी खाल्ली . प्रार्थनेचा आवाज ऐकू आला सामुहिक प्रार्थना सुरु होती ..बहुतेक प्राणायाम संपला होता .तो सकाळचा मिस्कील म्हातारा पुन्हा माझ्या जवळ आला ' काय कसे वाटतेय ' त्याचा स्वर कुत्सित होता हे जाणवले मला .त्याच्याशी न बोलणेच शहाणपणाचे आहे असे वाटले ..नुसता ठीक आहे अश्या अर्थाने मान हलवली . आणि पुन्हा पलंगावर डोळे मिटून पडलो . 

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment