Friday, August 8, 2014

स्वता:शी लढाई !

स्वता:शी लढाई ! ( बेवड्याची डायरी - भाग ५५ वा )

" व्यसनांमुळे निर्माण झालेले अथवा आधीपासूनच आपल्या स्वभावात असलेले .. स्वभावदोष काढून टाकण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते ..तसेच ती एकट्याच्या बळावर कधीच पूर्ण होत नाही ..कारण आपले स्वभाव दोष हे आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनलेले असतात ..तसेच अनेकदा हे स्वभावदोष आपण ..स्वतःच्या समर्थनासाठी ..स्वतःच्या बचावासाठी ..इतरांना घाबरविण्यासाठी ...आपल्या मनासारखे होण्यासाठी ..एक शस्त्र म्हणून वापरले आहेत ..आता हे स्वभाव दोष कर्णाच्या कवचकुंडलांसारखे आपल्या व्यक्तिमत्वाला चिकटून बसलेले आहेत ..या स्वभावदोषांमुळे आपण अनेकदा संकटात सापडलो आहोत तरीही आपण आपल्या स्वभावात काही दोष आहेत आणि ते काढून टाकले तरच कायमची व्यसनमुक्ती ..तसेच एक प्रसन्न आणि उपयुक्त असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभेल हे मान्य करणे कठीण जाते आपल्याला ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस च्या बारा पायऱ्या केवळ व्यसनमुक्तीच नाही तर एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारून आदर्श आणि अध्यात्मिक उंची गाठण्यासाठी मदत करतात म्हणून केवळ व्यसनमुक्त न राहता पुन्हा पुन्हा व्यसनात अडकू नये आणि आपले व्यक्तिमत्व स्वतःसाठी आणि इतरांसाठी उपयुक्त बनविण्याच्या उद्देशाने आपण सहाव्या पायरीत सांगितल्याप्रमाणे आपले स्वभावदोष काढून टाकण्याच्या प्रयत्नाला लागले पाहिजे .."

सर सहाव्या पायरीचे विवेचन विवेचन देताना पुढे म्हणाले " आपल्या व्यक्तिमत्वातील सारे स्वभाव दोष परमेश्वराच्या मदतीने काढून टाकण्यास सुचवले आहे ..म्हणजेच आपल्या जवळचे नातलग ..आपले शुभचिंतक ..आपल्याला वेळोवेळी योग्य वागणुकीसाठी प्रेरित करणारे आपले गुरुजन ..समुपदेशक .अथवा अल्कोलीक्स अॅनाॅनिमस मधील आपला स्पाॅन्सर ..तसेच वेळोवेळी आपल्यावर ओढवणारी परिस्थिती ..एखादी त्रासदायक घटना ..एखादी आपत्ती ..आपल्यावर टीका करणारे लोक ...हे सारेच परमेश्वर या व्याख्येत समाविष्ट आहे हे विसरता कामा नये ..आपले स्वभाव दोष काढून टाकण्यासाठी आपल्याला आवडेल अशी अनुकूल पद्धतच वापरली गेली पाहिजे हा अट्टाहास नको ..जसे शिल्पकार एखादे शिल्प कोरताना मोठी शिळा घेवून त्यावर छिन्नी ..हातोडी ..वगैरे हत्यारांचा वापर करून त्यातून एखादे सुंदर शिल्प साकार करतो तशीच ही प्रक्रिया असणार आहे ..सगळे मला अनुकूल असले तरच मी स्वतःमध्ये योग्य ते बदल करीन असे न म्हणता जमेल त्या प्रकारे ..आहे त्या परिस्थितीत ..त्रासदायक प्रसंगी ..अपमानजनक घटनेतूनही परमेश्वर मला काही शिकवण देवून माझे स्वभाव दोष काढून टाकण्यास मला मदत करू शकतो हा दृष्टीकोन असला पाहिजे ..प्रत्येक वेळी आपल्याशी गोड बोलून लोक आपल्याला बदलला प्रेरित करतील असे नव्हे तर काही वेळा रागावून ..टीका करून ..निर्भत्सना करून ..देखील लोक आपल्याला काही शिकवण देवू शकतात .. म्हणूनच तर संतानी म्हंटले आहे ' निंदकाचे घर असावे शेजारी '

आपल्याशी केवळ चांगले वर्तन करणारे लोक अथवा आपल्याला अनुकूल असलेली परिस्थितीच बदलास सहाय्य करेल असे नाही तर आपल्याशी दुरावा बाळगणारे ..सतत टीका करणारे ..आपल्या मनाविरुद्ध वागणारे लोक ..प्रतिकूल परिस्थिती देखील ..आपल्याला काही शिकवण देवू शकतात यावर विश्वास ठेवता आला पाहिजे ..त्यामुळे विपरीत प्रसंगात आपला विवेक सोडता कामा नये ..अर्थात हे सगळे ताबडतोब जमेल असे नाही ..मात्र बदलाचा ध्यास असला कि नक्की जमते " असे सांगत सरांनी फळ्यावर प्रश्न लिहिला.. " आपले स्वभावदोष दूर करण्यासाठी कोणी कोणी आजवर आपल्याला मदत केली आहे आणि कशा प्रकारे ? "...समूह उपचाराची संपला तसा मी लगेच डायरीत प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..डोळ्यासमोर अनेक प्रसंग होते जेथे मला वडिलांनी कठोर शब्दांचा वापर करून माझ्या वागण्यात बदल सुचवला होता ..ऑफिस मध्ये बाॅसने रागावून ..वाॅर्निग देवून मला फटकारले होते ..माझ्या लक्षात आले कि त्यावेळी मी अपमान न वाटून घेता हे लोक आपल्याला बदलासाठी मदत करत आहेत असे समजलो असतो तर नक्कीच मला फायदा झाला असता ..मात्र माझ्या अहंकारा मुळे मी त्यांनी माझा अपमान केला असे समजून बदल करण्याएवजी सूडभावना मनात ठेवली ..अथवा स्वतःला त्रास करून घेत दुप्पट व्यसने केली होती ..

( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment