Sunday, August 31, 2014

निसर्गाची ऐशीतैशी


निसर्गाची ऐशीतैशी ( बेवड्याची डायरी - भाग ५९ वा ) 


सरांनी चर्चेला घेतलेला ' लैंगिक शिक्षण ' हा विषय सुरवातीला जरी अनावश्यक वाटला होता तरीही ..हा विषय महत्वाचा आहे ..यावर मोकळेपणी चर्चा झाली पाहिजे ..शंकानिरसन झाले पाहिजे ..गैरसमज दूर झाले पाहिजेत असे सर्वाना वाटू लागले ..संडासात उघड्या नटीची फोटो घेवून जावून हस्तमैथुन करतो म्हणून आम्ही त्या तरुणाला हसलो होतो ..मात्र अंतर्मुख झाल्यावर आमच्या ध्यानात आले की बहुधा प्रत्येकाने कधी न कधी ' हस्तमैथुन ' केले होते . एकाने सरांना प्रश्न विचारला ' सर हस्तमैथुन दिवसातून किती वेळा केले म्हणजे नुकसानदायक असणार नाही ? ' सर हसून म्हणाले " छान ..आता तुम्हाला प्रश्न विचारेवेसे वाटत आहेत ..हे पहा सर्वात आधी एक स्पष्ट करणे गरजेचे आहे की लैंगिकता किवा शरीर संबंध अथवा कामतृप्ती हे जरी आपल्या जीवनाचे महत्वाचे आणि अविभाज्य अंग असले तरी लैंगिक संबंध किवा कामतृप्ती म्हणजेच सगळे जिवन नव्हे हे लक्षात ठेवा ...निसर्गाने निर्माण केलेला एक प्रगत ..प्रगल्भ ..वेगवेगळ्या भावना मनात निर्माण होणारा ..सामाजिक भान असणारा ..प्रश्न पडणारा आणि प्रश्नांची उकल करू शकणारा प्राणी म्हणून मानवाची निर्मिती झाली आहे ..आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून सर्व जीवसृष्टीचे ..प्राणीमात्रांचे मानवाने संरक्षण करावे हा देखील निसर्गाचा हेतू असला पाहिजे माणूस जन्माला घालण्यामागे ..इतर प्राणी ' आहार , निद्रा , भय , मैथुन या चार गोष्टीनी बांधले गेले आहेत या खेरीज त्यांची बुद्धी काम करत नाही ..मानव एकमात्र प्राणी आहे जो विविध कलाप्रकार ..क्रीडाप्रकार ..मनोरंजनाच्या विविध गोष्टींचा वापर करू शकतो ..तसेच अध्यात्मिकता हे अंग देखील मानवाकडेच दिलेले आहे ..कदाचित या मुळेच मानवाच्या बाबतीत ' नराचा नारायण होणे ' हा वाक्प्रचार वापरला जातो . मात्र मानवाने आपल्या बुद्धीचा वापर केवळ स्वताच्या स्वार्थासाठी ..भोगांसाठी.. सुरु केलाय त्यामुळेच अनेक नैसर्गिक असमतोल निर्माण होत आहेत ..लैंगिक संबंधांची प्रेरणा मनात निर्माण होऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता निर्माण करण्यामागे निसर्गाचा प्रजनन किवा पुनर्निर्माण हा एकमात्र हेतू आहे ..जीव सृष्टीचे अस्तित्व कायम राहावे म्हणून सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक प्रेरणा निर्माण करण्यात आलेली आहे ..

मानव सोडून इतर सर्व प्राणी लैंगिकतेचा वापर पुनरुत्पादन या एकमात्र हेतूने करतात ..म्हणूनच इतर प्राण्यांचा लैंगिक संबंध विशिष्ट कालावधीतच आणि विशिष्ट प्रकारेच घडतो ..जेव्हा मादी प्रजनन योग्य असते तेव्हाच प्राणी शरीर संबंध करतात ..ते देखील मादीच्या संमतीने ..अल्पवयीन शरीर संबंध किवा बलात्कार हे प्रकार प्राण्यामध्ये नसतात ..वयात आलेल्या मादीचा अनुयय करून ..इतर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून ..मगच प्राण्यांना लैगिक संबंध ठेवता येतो ..तसेच एका विशिष्ट वयापर्यंतच म्हणजे प्रजनन योग्य असेपर्यंतच प्राणी लैंगिक संबंध ठेवतात ..मानव मात्र आपल्या इच्छेनुसार ..जबरदस्तीने ..मूड आला म्हणून शरीर संबंध ठेवतो ..प्रजनन क्षमता कमी झाल्यानंतर म्हातारपणी देखील शरीरसंबंधांची लालसा ठेवतो ..तसेच मानवाने आपल्या आनंदासाठी मैथुनाचे विविध प्रकार शोधून काढले आहेत जे काही वेळा निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध असतात ..गुदामैथुन हा प्रकार प्राण्यांमध्ये बहुधा नसतो ..शरीर संबंध जरी निसर्गनियमानुसार आवश्यक असले ..गरजेचे असले ..त्यातून मिळणारा आनंदाचा .कामतृप्तीचा भाव कितीही हवाहवासा वाटला तरी..काही नैसर्गिक आणि सामाजिक मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे ..



हस्तमैथुन हे लैंगिक संबंधा इतकेच आनंद देणारे माध्यम असले तरी त्याचा अतिरेक नक्कीच हानिकारक ठरू शकतो ..तरुणांनी आठवड्यातून फार तर एकदा हस्तमैथुन करण्यास हरकत नसते ..हस्तमैथुन करणे म्हणजे पाप ..शक्तीनाश ..लिंग वाकडे होणे ..नंपुसक होण्याही शक्यता वगैरे गोष्टी सांगण्यामागे ब्रम्ह्चर्याचा पुरस्कार करण्याऱ्या लोकांचा अतिरेक असू शकतो ..अथवा तरुणांनी हस्तमैथुनाच्या आहारी जावू नये म्हणून घेतलेली काळजी असू शकते " सरांच्या या उत्तराने त्या तरुणाचे समाधान झालेले दिसले . 


लैंगिकतेचा संबंध थेट आपल्या जन्माशी आहे हे आपण जाणतोच त्यामुळे लैंगिकता किवा शरीरसंबंध हे पाप असू शकत नाही ...प्रजननाच्या नैसर्गिक प्रक्रियेत नर - मादी या दोघांचा समान सहभाग असतो ..त्यामुळे निसर्गाने नर आणि मादी हा जन्म दर विशिष्ट ठेवलाय ..मानवाच्या बाबतीत अनेक गैरसमजांमुळे ..पुरुषाला जास्त मोठेपणा देवून स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे तसेच वंशाला दिवा वगैरे धार्मिक गैरसमजांमुळे ..हुंडाप्रथा..लग्नासाठी करावा लागणारा खर्च ..अशा सामाजिक कारणांमुळे सध्या प्रत्येकाला आपल्याला मुलगा व्हावा असे वाटते ..त्यामुळेच स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे ..मित्रानो एक लक्षात घ्या हे निसर्गाला धरून नाही ..येथे विवेक वापरण्याची गरज आहे ..मुलीने जन्म घेवून तिच्यामुळे आईबापाला त्रास होऊ नये म्हणून मुलगी जन्माला येवू द्यायची नाही हा अतिशय स्वार्थी विचार आहे ..त्या ऐवजी जन्माला आलेल्या मुलीला सुरक्षितता मिळावी ..तिला सन्मानाने जगता यावे ..तिच्यावर अन्याय होऊ नये या साठी आवश्यक ते सामाजिक आणि मानसिक बदल करणे जास्त महत्वाचे आहे .. कारण जसा जसा निसर्गातील स्त्री चा जन्मदर कमी होत जाईल तशी तशी पुरुषांना अधिक असुविधा निर्माण होऊ लागेल ..स्त्री व पुरुष हे परस्परांना पूरक असल्याने स्त्रियांची संख्या कमी झाली तर लग्नाला जोडीदार मिळणे कठीण होईल ..शरीर संबंधांची गरज भागवणे दुरापास्त होईल ...असलेल्या स्त्रियांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल ..बलात्काराचे प्रमाण वाढत जाईल ..आणि मुख्य म्हणजे काही काळानी प्रजनन बंद होईल ..मानवसृष्टी धोक्यात येईल ..तेव्हा निसर्गाच्या विरुद्ध जाणे मानवाने थांबवले पाहिजे !

No comments:

Post a Comment